
14 फेब्रुवारी जवळ आलेला असून जगभरातील अनेक प्रेमी युगुले हा दिवस व्हॅलेंटाईन दिवस म्हणून साजरा करतात मात्र केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या प्राणी कल्याण मंडळाने एक अजब फतवा काढलेला असून त्यामध्ये व्हॅलेंटाईन दिवसा ऐवजी ‘ गौ मिठी ‘दिवस साजरा करा आणि गाईला मिठी मारा असे फर्मान काढलेले होते मात्र चौफेर टीका होऊ लागल्यावर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे . विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील यावर आपले मत व्यक्त केले होते त्यावेळी आपल्या सदसदविवेक बुद्धीला स्मरून प्रत्येकाने योग्य तो निर्णय घ्यावा, असे अजित पवार म्हणाले होते.
प्रेमी जोडपे एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी 14 फेब्रुवारी रोजी उत्साही असतात. व्हॅलेंटाईनच्या दिवशी प्रेम व्यक्त करण्याची एक संधी म्हणून या दिवसाची वाट अनेक जोडपी पाहत असतात मात्र भारतीय संस्कृतीला हे धरून नाही असे म्हणत उजव्या विचारसरणीच्या अनेक व्यक्तींकडून याआधी देखील या दिवसाला विरोध केला गेलेला आहे .विरोध म्हणून अनेक दुकानांची तोडफोड तसेच जोडप्याना त्रास देणे असेही प्रकार याआधी केले गेलेले आहेत.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या प्राणी कल्याण मंडळाने देशभरात 14 फेब्रुवारी रोजी गाईला मिठी मारण्याचे आवाहन केलेले होते. गाईला मिठी मारून आपण गाईबद्दलचे प्रेम व्यक्त करा असे देखील सांगत त्यांनी पाळीव प्राण्यांबरोबर थोडा वेळ घालवणे, त्यांच्यासोबत बसणे यामुळे मनाला शांती मिळते. गाईला देखील तिच्या पाठीवर गोंजारले तर तिला आराम मिळतो. गावाकडे राहणारे लोक गायीकडे केवळ प्राणी म्हणून पाहत नाही तर तिचे कुटुंबातील सदस्य म्हणून संगोपन करतात असे सांगत आवाहन केले होते. अतिउत्साही ‘ अंधभक्त ‘ जखमी होण्याच्या शक्यतेने तर हा निर्णय फिरवण्यात आला नाही ना ? याची देखील सोशल मीडियात चर्चा सुरु आहे. पाळीव प्राणी आपल्या मालकाला ओळखत असतात मात्र केवळ एका दिवसापुरत्या फोटो काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीची गौ मिठी जीवघेणी देखील ठरण्याची शक्यता आहे .