
रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी प्रकरणात स्थानिक रहिवाशांचा या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध आढळून येत असून प्रकल्प अधिकारी आल्यानंतर चक्क रस्त्यावर झोपून रस्ता अडवल्याचे काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाला विरोध होत असल्याकारणाने विरोधी पक्षनेते देखील आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याप्रकरणी फेसबुकवर आपली भूमिका मांडलेली आहे.
काय म्हणाले बाळासाहेब थोरात ?
रत्नागिरी येथील बारसू रिफायनरी स्थळी स्थानिक नागरिक, महिला, मुले सर्वजण रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करत आहेत. आज पोलिसांनी त्यांच्यावर व वार्तांकन करणा-या माध्यम प्रतिनिधींवर दडपशाही सुरु केली आहे हे अत्यंत निषेधार्ह असून सरकारने ही दडपशाही आणि सर्वेक्षण तात्काळ थांबवावे. सरकारच्या गलथानपणामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १४ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही करून सरकारला शेतक-यांचे बळी घ्यायचे आहेत का ?