
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील मंदिरातील वादाच्या पार्श्वभूमीवर मराठी चित्रपट अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट लिहिलेली असून त्यांच्या या पोस्टची सोशल मीडियात जोरदार चर्चा आहे. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून त्यांनी एक फोटो शेअर केलेला असून त्यामध्ये सदरा, उपरणं , डोक्यावर टोपी आणि कपाळावर टिळा अशा वारकरी यशात किरण माने दिसून येत आहेत सोबतच त्यांनी एक पोस्ट देखील लिहिलेली आहे तिची देखील जोरदार चर्चा सुरू आहे.
काय आहे किरण माने यांची पोस्ट ?
‘वारी’ ही लै लै लै नादखुळा गोष्ट हाय. खणत गेलं तर मानवतेचा खजिना सापडतो. आपल्या संतांनी असंच ‘टाईमपास’ म्हणून वारी आणि किर्तनपरंपरा सुरू केली नाय. माणसामाणसातले सगळे भेदभाव नष्ट करणारा खतरनाक विद्रोह होता तो.
…याचं जगात भारी उदाहरण म्हणजे पैठणचा हजरत इद्रिस हुसैनी सय्यद सादात दर्गा ! संत एकनाथांच्या पालखीसाठी जाणाऱ्या किंवा नाथषष्ठीसाठी आलेल्या दिंड्या याच दर्ग्यात मुक्कामाला थांबत्यात. तिथले मुस्लिम बांधव सगळ्या वारकऱ्यांची लैच प्रेमानं, उत्साहानं सेवा करत्यात. या मुक्कामात आपले वारकरी दर्ग्याला भक्तीभावानं पूजत्यात. मुस्लिम बांधवांकडनं आपल्या वारकर्यांना जेवण दिलं जातं.
…विशेष म्हणजे या काळात ह्या दर्ग्यात नमाज आणि भजन दोन्ही ‘अदा’ होतं ! ज्यावेळी मुस्लिम बांधवांच्या नमाजाची वेळ होते त्यावेळी वारकरी आपले भजन थांबवून ब्रेक घेत्यात आणि नमाज पूर्ण झाला की वारकरी परत भजन कंटिन्यू करत्यात !! एरवी सहज दर्शनाला पैठणला गेलेला वारकरी मज़ारीवर माथा टेकूनच येतो. जे मुस्लीम भाविक दर्ग्यात येत्यात, ते एकनाथ महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाहीत.
संत एकनाथ महाराज आणि हजरत इद्रिस हुसैनी या दोन्ही महामानवांना या सलोख्याच्या वारीतनं आपल्या सगळ्यांना कायतरी ‘मेसेज’ द्यायचाय. तो आपण समजून घेतला पायजे.ज्ञानेश्वरांनी सुरू केलेला ‘भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे’ हा विचार नामदेव, तुकोबारायांपास्नं आपल्या सगळ्या संतांनी अंगीकारला… तीच परंपरा आपल्या आज्ज्या-पणज्यांनी, बापजाद्यांनी जोपासत आपल्यापर्यन्त आणलीय. ती फुकून आपल्या पुढच्या पिढ्यांच्या मनामेंदूत नफरतीचं विष पेरायचं, का आपल्या बापजाद्यांचा वारसा समृद्ध करायचा हे आपलं आपण ठरवायचंय. आपल्या धडावर ‘आपलंच’ डोकं हाय…- किरण माने.