
देशात एक खळबळजनक अशी घटना मध्यप्रदेशातील बैतुल येथे समोर आली असून बोअरवेलमध्ये पडलेल्या सहा वर्षाच्या मुलाला तीन दिवस उलटून देखील बाहेर काढण्यात प्रशासनाला अपयश आले आणि सदर मुलाने यात प्राण गमावले आहेत. चारशे फूट खोल असलेल्या बोअरवेलमध्ये मुलगा पडला त्यानंतर बोअरवेलच्या बाजूला समांतर असा खड्डा करण्यात आला मात्र बोगदा करताना ढिगारा पडला आणि त्यानंतर हा मुलगा मृत्युमुखी पडला.
उपलब्ध माहितीनुसार, सदर मुलाचे नाव तन्मय असे असून त्याचे वडील सुनील साहू आणि आई रितू यांनी मुख्यमंत्र्यांना मुलाला लवकर बाहेर काढण्यासाठी आवाहन केले होते तर आपल्या मुलासाठी प्रार्थना करा असे देखील त्यांनी म्हटले होते. जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणी माहिती देताना आम्ही तन्मयपासून केवळ तीन फूट दूर आहोत असे देखील सांगण्यात आले होते मात्र त्याची काहीही हालचाल दिसत नव्हती असे म्हटले आहे. सदर घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने उघडे बोअरवेल ठेवणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी असे देखील नागरिकांचे म्हणणे आहे.