
लाचखोरीचे एक अजब प्रकरण सध्या नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे समोर आलेले असून तालुक्यातील हिवरखेडे येथे नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत तलाठी कार्यालयात जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी तलाठी महाशयांकडून चक्क पार्टी करून जेवणाचे बिल तुम्हाला द्यावे लागेल अशी अट समोरच्या व्यक्तीला टाकण्यात आली होती. तक्रारदार व्यक्ती यांनी 10 64 नंबरवर फोन करून याप्रकरणी तक्रार दिली आणि त्यानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
उपलब्ध माहितीनुसार, रवींद्र कारभारी मोरे असे आरोपी व्यक्तीचे नाव असून तक्रारदार व्यक्ती हे कांदा व्यापारी आहेत. कांद्याच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून त्यांनी वडिलांच्या नावाने पन्नास गुंठे जमीन विकत घेतली होती आणि सातबारावर त्याचे त्यांना नाव लावायचे होते. तलाठी कार्यालयात जाऊन त्यांनी याप्रकरणी चौकशी केली तेव्हा ‘ त्यांनी नाव तर लावू पण आम्हाला पार्टी द्यावी लागेल ‘ असे सांगत पार्टीची लाच मागितलेली होती त्याचे बिल दोन हजार साठ रुपये झाले.
आरोपी व्यक्ती आणि तक्रारदार व्यक्ती हे एका हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांनी पोटभरून जेवण केले आणि त्यानंतर तक्रारदार व्यक्ती यांना हॉटेलचे बिल देण्यास भाग पाडण्यात आले. सदर पार्टीची मागणी ही सुमारे एक महिन्यापूर्वी करण्यात आली होती मात्र पार्टीसाठी मुहूर्त हा चार दिवसांपूर्वी ठरला होता मात्र दरम्यानच्या काळात तक्रारदार यांनी एसीबीकडे या संदर्भात तक्रार केली आणि हॉटेलमध्येच सापळा रचण्यात आला . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केलेली असून जर कोणी लाचेची मागणी केली तर टोल फ्री 1064 नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आलेले आहे.