
गेल्या काही वर्षांपासून पत्रकार बांधवांना काम करणे अवघड होत असून रत्नागिरीत एका पत्रकाराचा संशयास्पद मृत्यू झालेला असताना असाच एक खळबळजनक प्रकार नगर शहरात समोर आलेला आहे. शहरातील पत्रकार असलेले सचिन दसपुते यांना एका व्यक्तीने फोनवर धमकी दिल्याचा प्रकार समोर आलेला असून ‘ पाच लाख रुपयांची खंडणी दिली नाही तर तुम्हाला जिवे मारू टाकू ‘ अशी धमकी देण्यात आलेली आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे .
सचिन दसपुते हे सोमवारी त्यांच्या कार्यालयात काम करत असताना दुपारी चारच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीने फोन केला त्यावेळी त्याने समोरील व्यक्तीने ‘ आपने स्वामी प्रसाद मौर्य इनके बारे मे टेलिकास्ट चलाया है .. इलाहाबाद से बोल रहा हु.. तुम स्वामी मौर्य उनके बारे मे लिखना बंद कर दो मरना तुम्हे जान से मार देंगे.. नही तो तुम्हे उनके इल्जाम मे फसा देंगे.. तुम किधर से आते हो जाते हो सब हमको मालूम है. चुपचाप हमे पाच लाख रुपये दे दो नही तो तुमको जान से मार देंगे ‘ अशी हिंदीत धमकी दिली. सचिन दसपुते यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीच्या विरोधात तक्रार दिली.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्यावेळी हा फोन नगर इथून नव्हे तर औरंगाबाद इथून आल्याचे समोर आलेले असून सदर व्यक्तीवर तात्काळ कारवाईची मागणी पत्रकार बांधवांकडून करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून समाजमाध्यमांमध्ये लिहिणाऱ्या पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवणे, धमक्या देणे, अज्ञात ठिकाणी बोलावून मारहाण करणे असे प्रकार उघडकीला येत असून पोलिसांकडून नागरिकांचे तर सोडाच पण पत्रकारांवर झालेले हल्ले देखील गांभीर्याने घेतले जात नाहीत त्यामुळे पोलिसांच्या देखील भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.