
आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी नगर शहरात येऊन महापालिकेचे आयुक्त यांचा चक्क आपल्या भाषणामध्ये XX खाऊ म्हणून उल्लेख केलेला होता. महापालिका आयुक्तांना शिवीगाळ करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मनपा कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी राणे यांच्या विरोधात निषेध सभा घेतलेली असून बुधवारी प्रभाग कार्यालयासह मुख्य कार्यालयातील देखील अत्यावश्यक सेवा वगळता कामकाज बंद ठेवलेले होते.
महापालिका कार्यालयात बुधवारी सकाळी 11 वाजता निषेध सभा झाली त्यावेळी महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी यावेळी बोलताना, ‘ आमदार राणे यांना आयुक्तांच्या कामकाजाबाबत काही आक्षेप असेल तर त्यांनी कायदेशीर मार्गाने तक्रार करावी मात्र शिवीगाळ करत त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरलेली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून राणे वातावरण दूषित करण्याचे काम ते करत आहेत. नगर शहरात कोणीही येऊन महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना शिवीगाळ करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. राजकीय पुढार्यांनी येथील सलोख्याचे वातावरण खराब करू नये ‘ असे म्हटलेले आहे.
नगर महापालिकेने गेल्या काही दिवसात शहरातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सुरू केलेली असून त्यामध्ये किरकोळ फेरीवाले आणि रस्त्यावरील दुकाने हेच निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. शहर आणि उपनगरातल्या मोठ्या धेंडांच्या बांधकामावर हातोडा चालवण्याची अद्यापही महापालिका अधिकाऱ्यांची हिंमत झालेली नाही . किरकोळ स्वरूपाच्या कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात महापालिका कर्मचारी आणि अधिकारी सरावलेले असून आयुक्तदेखील अतिक्रमणे काढण्यासाठी पुढाकार घेत नसल्याने नितेश राणे यांनी संताप व्यक्त केलेला होता.
नगर शहरात दोन व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला झालेला होता त्यानंतर शहरात याला धार्मिक रंग देण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला मात्र नगरवासीयांनी हा प्रयत्न हाणून पाडला. नितेश राणे यांचे नगर येथे आगमन झाल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून नितेश राणे यांनी देखील भाषणात अशाच स्वरूपाची अनेक वक्तव्य केलेली आहेत. अतिक्रमण काढणे ही महापालिकेची जबाबदारी आहे मात्र कारवाई सर्वांवर समान प्रकारे व्हावी. महापालिका अधिकारी मोठा धेंडांची अतिक्रमणे काढत नाहीत मात्र किरकोळ अतिक्रमणे काढून कारवाई केल्याचे दाखवतात असे अनेक नागरिक खाजगीत बोलत असून महापालिका अधिकारी आणि कर्मचारी हे देखील कारवाईत राजकीय हस्तक्षेप आहे असे गोंडस नाव देत स्वतःची अकार्यक्षमता झाकण्याचा प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत त्यामुळे नितेश राणे यांचे वक्तव्य अनेकांना झोंबलेले पाहायला मिळत आहे.