
महाराष्ट्रात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या अमरावती जिल्ह्यात समोर आलेले असून नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे अंतर्गत ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने गळफास घेत आपल्या आयुष्याचा अंत केलेला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवलेली होती त्यामध्ये माझ्यावर झालेल्या अन्यायाबाबत मला न्याय मिळावा अशी मागणी केलेली आहे. चेतन राठोड असे मयत व्यक्तीचे नाव असून आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यावी असे देखील त्यांनी आवाहन केलेले आहे.
अमरावती तालुक्यातील बडनेराजवळ दुर्गापूर येथे एका मंदिराजवळ हा प्रकार समोर आलेला असून घटनास्थळी पोलीस पोहोचल्यानंतर त्यांनी मृतदेह खाली उतरवला. व्हाट्सअप स्टेटसला त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवलेली होती त्यामध्ये ऑडिटमध्ये कागदपत्रे दाखवली नाहीत म्हणून माझ्यावर 29 लाख रुपयांची रिकव्हरी काढण्यात आलेली असून घरकुलाचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते मात्र घरकुलाच्या घोटाळ्यामध्ये माझ्यावर रिकवरी काढून मला सेवेतून कमी करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला मार्गदर्शन केले नाही असा देखील आरोप चेतन राठोड यांनी केलेला आहे.
काय आहे चेतन राठोड यांची सुसाईड नोट ?
प्रिय बायको आणि माझ्यावर जीव लावणाऱ्या सर्व मित्र मैत्रिणींना शेवटचा रामराम. हसमुख आणि सर्वांना खूश ठेवणारा माझा स्वभाव. मी इतरांना कधी नाराज केले नाही. मी स्वतः नाराज असताना कोणाला दाखवले नाही. याचे कारण माझ्यामुळे कोणी दुःखी होऊ नये. मी 2008 मध्ये ग्रामसेवक पदावर रुजू झालो असून आजही लोक मला माझ्या कामामुळे ओळखतात. मी गावातील कोणत्याही नागरिकाला त्रास दिला नाही. 2012 -13 मध्ये मी फुबगाव येथे अतिरिक्त ग्रामपंचायतीचे काम सांभाळले. त्यावेळी अभिजित ढेपे यांच्याय प्रयत्नाने सुरेश बाबा संस्थान येथे मोठ्या प्रमाणात काम झाले. त्यानंतर माझी बदली झाली. मात्र तिथे ऑडिट झाले तेव्हा सुरेश बाबा संस्थान येथे झालेल्या कामाचे रेकॉर्ड दाखवण्यात आले नाही. त्यामुळे माझ्यावर 29 लाख रुपयांची रिकवरी काढण्यात आली. त्यावेळी पंचायत विस्तार अधिकारी देशमुख यांनी तपासणी केली. त्यावेळी मी विनंती केली आणि रिकवरी दाखवण्यासाठी थोडा वेळ मागितला. पण नांदगाव खंडे येथे मला सहकार्य करण्यात आले नाही.
त्यानंतर 2016-17 मध्ये माहुली चोर इथला पदभार स्विकारला. त्यानंतर गाव स्मार्ट ग्राम करुन दाखवले. स्मार्टग्राममुळे घरकुल योजनेला ग्रामसभेने मंजुरी दिली. पाहणी झाल्यानंतर घरकुल योग्य असल्याचे म्हणत त्याला मंजुरी देण्यात आली. घरकूल मंजुर झाल्यानंतर त्याचे काम झाले. गावातील राजकारण समोर आल्यानंतर माझी तक्रार केली आणि त्यानंतर माझी चौकशी करण्यात आली आणि मला दोषी ठरवण्यात आले. घरकुलाचे पैसे पंचायत समिती कार्यालयामधून जातात आणि ते लाभार्थिच्या खात्यात जातात. मग ग्रामसेवक दोषी कसा काय? मला घरकुल घोटाळा प्रकरणामध्ये 1386000 चा भ्रष्टाचार केला म्हणून थेट सेवेतून कमी केले. कमलाकरजी वणवेसाहेब ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष आपल्याला एक विनंती आहे की माझ्यावर लावलेला आरोप योग्य नाही. याबद्दल तुम्ही पूर्ण महाराष्ट्राची ग्रामपंचायत बंद करा आणि मला न्याय मिळवून द्या.
मी आताच नवीन घर बांधले असून त्याच्यावर एचडीएफसी बॅंकेचे कर्ज आहे. मी गेल्यावर माझा परिवार उघड्यावर येऊ नये म्हणून आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करावी. पंकज माझा लहान भाऊ तुझ्यावर आता मोठी जबाबदारी आहे. बाबा तर आधीच सोडून गेले आता मी पण… खचून जाऊ नकोस हिमतीने राहायचे. आईचा तुझ्या वहिणीचा आणि होणाऱ्या बाळाला सांभाळ करशील. चारु माझी अश्मी तुला आता मोठे बाबा दिसणार नाहीत. लिहीताना खूप रडत आहे मी. वैदेही तुला हिमतीने राहायचे आहे. होणारा बाळ मीच आहे असे समज आणि त्याची काळजी घे .