
जेव्हा भाजपकडील सगळे पर्याय संपतात त्यावेळी त्यांना गांधी परिवार दिसतो आणि मग गांधी परिवाराकडे बोट दाखवले जाते असा सनसनाटी आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. भाजपने त्यांच्या दहा वर्षाच्या कामाची उपलब्ध दाखवली असती आणि जनतेच्या भरवशावर मते मागितली असती तर राष्ट्रवादीसारख्या पुरोगामी पक्षाची भाजपला गरजही वाटली नसती , असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेले आहे.
विजय वडेट्टीवार म्हणाले की , ‘ तुम्ही स्वतःला हिंदुत्ववादी हिंदुत्वाचे मसीहा समजता , विदेशात जाऊन गोडवे गाता मात्र देशातील जनतेला तुम्ही काहीच दिलेले नाही. त्यांना गांधी नावाची भीती असल्याने आता घराणेशाही किंवा परिवारवाद हा एकच पर्याय भाजपने पुढे केलेला आहे ‘. कळवा रुग्णालयात 18 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुरुवारी ते ठाण्यातील कळवा इथे पोहोचलेले होते.
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की , ‘ राज्यातील सरकारमध्ये सध्या सगळेच अलबेल सुरू आहे . राज्यात केवळ सत्तेची साठमारी सुरू असून यातून केवळ राज्याची तिजोरी लुटण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. मुख्यमंत्र्यांसोबत असलेले 40 आणि आता जे गेले आहेत ते 40 हे सर्वजण आपापल्या समर्थकांची तिजोरी भरण्याचे काम करत आहेत . ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांची तिजोरी भरली जात आहे मात्र ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही ते अद्यापही नाराज आहेत ,’ असे देखील ते पुढे म्हणाले.