
महाराष्ट्रात एक खळबळजनक अशी घटना औरंगाबाद येथे समोर आलेली असून सादतनगर परिसरात घरातील दोन चिमुकल्यांची गळा आवळून रविवारी रात्रीच्या वेळी हत्या करण्यात आलेली आहे . औरंगाबादजवळील सातारा पोलिसांनी याप्रकरणी या मुलांच्या आईला ताब्यात घेतलेले असून तिनेच हा खून केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उपलब्ध माहितीनुसार, आदिबा फहाद बरसावी आणि अली फहाद बरसावी अशी या चिमुरड्यांची नावे असून ते अवघे सहा ते सहा आणि चार वर्षांचे आहेत. रविवारी जेवण केल्यानंतर ते खोलीमध्ये झोपी गेले होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत खोलीतून बाहेर आले नाही म्हणून आई त्यांना उठवण्यासाठी गेली त्यावेळी ते बेशुद्ध असल्याचे कुटुंबाच्या लक्षात आले असे पोलिसांना सांगण्यात आलेले होते. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुपारी दीडच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दोघांच्या शरीरावर कुठलेही व्रण आढळून आलेले नव्हते त्यामुळे त्यांचा मृत्यू कसा झाला याविषयी परिसरात जोरदार चर्चा सुरू झालेली होती. प्राथमिक अहवालात त्यांचा मृत्यू गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झालेले असून पोलिसांनी त्यानंतर तात्काळ कारवाई करत त्या मुलांच्या आईला ताब्यात घेतलेले आहे. सदर महिला ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती असून पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत .सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, सहायक फौजदार चंद्रभान गवांदे यांनी याप्रकरणी तात्काळ घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात केली होती.