
लहानपणापासून अंगावर खाकी वर्दी असण्याचे स्वप्न पाहिले मात्र परिस्थिती खराब असल्याने पुढील वाटचालीसाठी अडचणी निर्माण झाल्या आणि दरम्यानच्या कालावधीत लग्न देखील होऊन गेले मात्र मनातील खाकी वर्दीची इच्छा अद्यापही टिकून होती त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत बारामती तालुक्यातील सोमेश्वर इथे तीन विवाहित तरुणींची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सोमेश्वर गावच्या तिन्ही विवाहित तरुणी असून मीनाक्षी करचे, आरोही शिळीमकर आणि दिपाली राणे अशी या महिलांची नावे आहेत. लहानपणापासून पोलीस बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. दरम्यानच्या काळात विवाह देखील होऊन गेला मात्र तरी देखील त्यांचा संघर्ष सुरूच होता अखेर तिन्ही मैत्रीणींची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झालेली आहे.
दिपाली राणे यांच्या लग्नाला सात वर्षे झालेली असून त्यांना एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. त्यांचे पती एका ठिकाणी खाजगी नोकरीला असून लहानपणापासून आपल्या अंगावर खाकी वर्दी असावी असे त्यांचे स्वप्न होते. आपला भाऊ सागर याच्यासोबत विवेकानंद अभ्यासिका येथे त्या अभ्यासाला जात असत. मागील भरतीमध्ये आलेले अपयश त्यांनी पुसून काढलेले असून दिपाली यांची पिंपरी पोलिसात निवड झालेली आहे तर त्यांच्या मैत्रिणी असलेल्या मीनाक्षी यांची पुणे लोहमार्ग तर आरोही यांची ठाणे पोलीस दलात निवड झालेली आहे.
मीनाक्षी यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झालेली असून त्यांची मोठी मुलगी आठवीला तर लहान मुलगी पाचवीला शिकत आहे. लग्नाआधी केवळ बारावीपर्यंत त्यांचे शिक्षण झालेले होते मात्र त्यानंतर त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले आणि पोलीस भरतीचा निर्णय गांभीर्याने घेतला. सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना कसरत होत होती मात्र त्यांच्या मुलींचे देखील आईला खाकी वर्दीत पाहण्याचे स्वप्न होते. सातत्याने आपण कष्ट घेतले आणि त्यानंतर यश मिळाले अशी भावना मीनाक्षी करचे यांनी व्यक्त केलेले आहे.
आरोही शेळीमकर यांनी देखील या प्रकरणी बोलताना अभ्यासिकेवरून रात्री नऊ वाजता घरी यायचे त्यावेळी सासुबाई स्वतः स्वयंपाक करून ठेवायच्या. पोलीस भरतीसाठी सासूबाईंनी भरपूर मदत केलेली असून मैत्रिणीचा फोन आला आणि माझं सिलेक्शन झालंय हे कळाल्यानंतर घरच्यांनी जणू दिवाळी साजरी केली असे म्हटलेले आहे .