
नगर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात गाजलेल्या श्रीरामपूरच्या लव्ह जिहाद प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली असून या प्रकरणातील सहा आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे. श्रीरामपूर येथील या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यानंतर तिचे बळजबरीने धर्मांतर करण्यात आले असे प्रकरण समोर आले होते. सदर प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कट्टर याच्यासह सहा आरोपींवर मकोका लावण्यात आलेला आहे.
श्रीरामपूर येथील हा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित केला होता त्यानंतर त्यांनी श्रीरामपूर येथे मोर्चा देखील काढला होता. इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कट्टर, प्रशांत गोरे, सुमन पगारे, सचिन पगारे, बाबासाहेब चेंडवाल, मिनाबाई मुसावत अशी मकोका लावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सदर प्रकरणी आत्तापर्यंत तीन पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असून आरोपींना मदत केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मुंबईतील गॅंगवॉरचे कंबरडे मोडण्यात या कायद्याने महत्वाची भूमिका बजावली होती .
नितेश राणे यांनी या प्रकरणी विधिमंडळात आवाज उठवला होता त्यानंतर हे प्रकरण राज्यस्तरावर चर्चेत आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सदर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. सर्वप्रथम तक्रार दिलेल्या पीडित मुलीच्या परिवाराने आरोपी हे पोलिसांच्या मदतीने आपल्यावर दबाव आणण्याचे काम करत आहेत असा धक्कादायक आरोप केला होता त्यानंतर तीन जणांचे निलंबन करण्यात आले आहे .
एका अल्पवयीन मुलीचे शाळेतून अपहरण करून धर्मांतर करण्यात आले आणि त्यानंतर तिच्यासोबत निकाह करण्यात आला. सदर प्रकरणातील मुख्य आरोपी इमरान कुरेशी उर्फ मुल्ला कटर ( वय ३५ ) याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. पीडित मुलीच्या घरच्यांनी याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाणे इथे तब्बल तीन वर्षांपासून हेलपाटे मारले होते मात्र पोलिसांकडून या प्रकरणात दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. श्रीराम सेनेने या प्रकरणात लक्ष घातले आणि त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानंतर स्थानिक पोलीस कामाला लागले.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी इम्रान हा आधीच विवाहित असून गेली तीन वर्षे पीडितेचे नातेवाईक पोलिसांकडे मदतीची याचना करत होते मात्र त्यांना काहीच प्रतिसाद पोलिसांकडून मिळत नव्हता. स्थानिक पोलीस निरिक्षक संजय सानप यांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला असून तब्बल तीन वर्ष पोलिस स्टेशनचे उंबरठे झिजवूनही पिडीतेची तक्रार स्थानिक पोलिस दाखल करून घेत नव्हते. श्रीराम सेनेने या प्रकरणात पुढाकार घेतल्यानंतर सूत्रे हलली आणि आरोपी गजाआड झाला .
आरोपीने 2019 मध्ये 13 वर्षाची असताना पीडितेला बळजबरीने शाळेतून उचलून तिचे अपहरण केले होते आणि त्यानंतर तिचे धर्मांतर केले. तिचे धर्मांतर केल्यावर तिच्याशी निकाह करुन तीन वर्षापासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ आरोपी करत होता. मुलीचे वय आता १६ वर्षे असून ती गर्भवती आहे. अत्याचार करणारा आरोपी हा आधीच विवाहित असून त्याचे वय जवळपास पीडितेच्या दुप्पट आहे. शहरातील वॉर्ड क्रमांक 2 मध्ये तो वास्तव्यास असून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
आरोपी इम्रान कुरेशी उर्फ मुल्ला कटर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याची या परिसरात मोठी दहशत असल्याने त्याने इतरही अनेक मुलींसोबत असा प्रकार केल्याचा आरोप पीडित मुलीच्या घरच्यांनी केला आहे सोबतच त्याची दहशत असल्याने कोणी पुढे येत नाही असेही म्हटलेले आहे. अपहरण , अत्याचार, जबरदस्ती धर्मांतर इतके गंभीर प्रकरण असूनही पोलिसांनी या प्रकरणात बोटचेपी भूमिका का घेतली ? यावर देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.