रिझर्व बँकेने कोणत्याही नाण्यांवर बंदी घातली नसली तरी दहा रुपयाचे नाणे चलनातून मात्र बाद झाल्याचे दिसत आहे. बँका तसेच ग्राहक देखील दहा रुपयाचे नाणे पाहून याकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. लोकांमध्ये असलेल्या गैरसमजामधून हा प्रकार घडत असून सरकार अथवा रिझर्व बॅंक यांच्याकडून देखील अद्यापपर्यंत कुठलाही खुलासा समोर आला नसल्याने या गैरसमजामध्ये आणखीनच भर पडते आहे.
चलनातील नाण्यांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. सध्या एक रुपया, दोन रुपये, पाच आणि दहा रुपये अशी नाणी चलनात वापरली जातात मात्र तरीदेखील दहा रुपयाच्या नाण्यांवर संक्रात आली असून बँका तसेच ग्राहक देखील ही नाणी स्वीकारत नाहीत. काही ठिकाणी सुट्टे पैसे नसल्यावर आता हे 10 चे टोकन घेऊन जा अन पुन्हा मलाच परत करा, असा आग्रह करत ही नाणी ग्राहकांना देण्यात येत आहे किंवा पाच रुपयाचे दोन ठोकळे द्या, असा आग्रह केला जात आहे. दहा रुपयाच्या नाण्याच्या बाबत गैरसमज पसरल्यामुळे एक प्रकारे ही नाणी चलनातून बाद झाली की काय याबाबतीत देखील संभ्रम निर्माण होत आहे.
बँकेने कोणत्याही नाण्यांवर बंदी घातलेली नाही किंवा रिझर्व बँकेचा तसा आदेशही नाही मात्र नागरिकांमध्ये दहा रुपयाच्या नाण्यांच्या बाबतीत गैरसमज पसरत असून ग्राहक व दुकानदार यांनी हे नाणे स्वीकारण्यात गैर काहीही नाही मात्र केवळ गैरसमजामधून हा प्रकार घडत असून अशा पद्धतीने नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. रिझर्व बँकेने यासंदर्भात तात्काळ खुलासा करण्याची गरज निर्माण झालेली आहे.