नगर जिल्ह्यात तब्बल ६१ गावांमध्ये कडक निर्बंध लागू , काय आहे नवीन नियमावली ?

शेअर करा

राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोनाचा संसर्ग घटत असताना नगर जिल्ह्यात मात्र कोरोनाने पुन्हा घोर वाढवला आहे . नगर जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के आहे त्यामुळे जिल्ह्यातील १० पेक्षा जास्त उपचाराधीन रुग्ण असलेल्या ६१ गावांत कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या गावांमध्ये ४ ते १३ ऑक्टोबरपर्यंत कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. त्यामुळे तेथील शाळा आणि मंदिरेही बंद ठेवण्यात येणार आहेत.

लॉक डाऊन करण्यात आलेल्या गावांमध्ये सर्वाधिक २४ गावे संगमनेर तालुक्यातील आहेत. श्रीगोंदा नऊ, राहाता सात, पारनेर सहा, शेवगाव चार, अकोले व श्रीरामपूर प्रत्येकी तीन, कर्जत दोन तर कोपरगाव व पाथर्डी प्रत्येकी एका गावाचा समावेश आहे. कडक लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील फक्त किराणा दुकाने ते देखील सकाळी ८ ते ११ या वेळेतच सुरू राहतील.

गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यास आणि बाहेरच्या लोकांना या गावात येण्यास बंदी राहील. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. विवाह आणि इतर कार्यक्रमांना बंदी आहे. तर अंत्यविधी आणि दशक्रिया विधी २० लोकांच्या उपस्थितीत करता येईल. गावातील अंतर्गत आणि पर्यायी रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. मुख्य रस्त्यावरील गावांत फक्त पुढे जाणाऱ्या वाहनांनाच परवानगी देण्यात येणार आहे. बाहेरगावच्या लोकांना अशा गावात थांबता येणार नाही.यासोबत कंटेन्मेंट झोनचे सर्व निर्बंध लागू राहणार आहेत.

नगर जिल्ह्यात अद्यापदेखील दैनंदिन रुग्णसंख्या ५०० ते ८०० च्या दरम्यान आहे. उपाययोजना करण्याच्या अनेक सूचना देण्यात आल्या मात्र फरक पडला नाही.उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आढावा बैठक झाली. त्यावेळी ससून हॉस्पिटलमध्ये नगर जिल्ह्यातील ४० टक्के रुग्ण असल्याची माहिती पुढे आली. त्यावर हे रुग्ण कोणत्या गावांतील आहेत, तेथील परिस्थिती का आटोक्यात येत नाही, याचा शोध घेऊन कडक उपाय करण्याचा आदेश अजित पवार यांनी दिला होता त्यानंतर आधीचे २० रुग्ण हा आकडा कमी करून १० वर घेण्यात आला आणि निर्बंध लावण्यात आले. नगर, जामखेड व राहुरी तालुक्यातील एकाही गावाचा यामध्ये निदान वृत्त लिहले जाईपर्यंत समावेश केलेला नाही.


शेअर करा