हृदयद्रावक..राहुरीतील शेतकऱ्याच्या आत्महत्येचे कारण ऐकून डोळे पाणवतील

शेअर करा

कोरोना काळात अनेक हॉस्पिटलची आणि मेडिकल व्यावसायिकांची चांगली चांदी झाली मात्र अनेक ठिकाणी नागरिकांना अक्षरश: कर्ज घेऊन कोरोनाचा खर्च करावा लागला. काही ठिकाणी हा खर्च आटोक्यात बाहेर गेल्यानंतर देखील व्यक्ती वाचवण्यात यश आले नाही, अशाही घटना घडल्या . नगर जिल्ह्यातील राहुरी येथील सुहास सोनवणे ( वय 48 ) या शेतकऱ्याने अशाच कर्जाला कंटाळून दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आलेली आहे. शनिवारी ही घटना घडली असून राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

कोरोना काळात पत्नीच्या कोरोनावरील उपचारासाठी सोनवणे यांनी दहा लाख रुपये खर्च केला होता. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी जवळच्या नातेवाइकांकडून हे पैसे उसने घेतले होते मात्र कोरोनानंतरही सुहास यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली नाही आणि हे पैसे परत करणे हे त्यांच्याकडून शक्य होत नव्हते. सुहास पद्मनाथ सोनवणे ( राहणार नगर मनमाड रोड सिनारे हॉस्पिटल शेजारी भालचंद्र वसाहत राहुरी ) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सुहास सोनवणे यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी व मुलगा असा त्यांचा परिवार आहे. ते शेती व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कोरोनाच्या काळात त्यांच्या पत्नी पुष्पा सोनवणे यांना कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे त्यांच्यावरील उपचारासाठी परिवाराला नऊ ते दहा लाख रुपये उभे करावे लागले होते.

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने सदर कर्ज हे डोई जड झाले होते आणि कुटुंब तणावपूर्ण परिस्थितीत जगत होते. अखेर या कर्जाला कंटाळून सुहास यांनी 16 ऑक्टोबर रोजी पहाटेच्या दरम्यान घरात असलेल्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी खरात हे करत आहेत.


शेअर करा