नगर जिल्ह्यात वीज चोरीच्या बाबतीत महावितरणने कडक पावले उचलली असून दर महिन्याला विजेचा वापर शून्य ते 40 युनिटपर्यंत येणारे ग्राहक सध्या महावितरणच्या निशाण्यावर आहेत . सदर ग्राहकांच्या वीज मीटरची महावितरणकडून फेर तपासणी सुरू असून त्यात काही ठिकाणी वीज मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी केल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत.
दर महिन्याला ग्राहकांचा वीज वापर किती होतो यासाठी महावितरण कडून रिडींग घेतले जाते त्यात काही ग्राहकांचा विजेचा वापर हा चक्क शून्य आढळून येतो आणि वीज बिल येत नसल्याने ग्राहक देखील बेफिकीर राहतात, मात्र खरोखरच वापर शून्य झाला आहे की मीटरमध्ये फेरफार करून हा वापर शून्यावर आणला आहे. तसेच काही ठिकाणी वीज वापर हा केवळ चाळीस युनिटच्या देखील खाली असतो, मात्र प्रत्यक्षात विजेचा वापर मोठ्या प्रमाणात केला देखील जातो. त्यामुळे विजेचा वापर खरेच तेवढा आहे कि बिल कमी करण्यासाठी मीटरमध्ये छेडछाड केली आहे याची तपासणी मोहीम महावितरणने उघडली आहे.
महावितरणने दारिद्ररेषेखालील ग्राहकांना दिलेल्या वीज मीटरची रिडींग दरमहा 10 ते 30 च्या दरम्यान असते मुळातच या ग्राहकांचा वीज वापर हा टीव्ही, फ्रिज इस्तरी किंवा इतर जास्त वीज पुरवठा खाणारी आवश्यक असणारी उपकरणे यांच्याकडे नसतात. त्यामुळे काही ठिकाणी महावितरणला देखील रीडिंग प्रमाणेच बिल द्यावे लागते तर काही ठिकाणी मात्र महावितरणचे अनेक मीटर नादुरुस्त झाले आहेत. ग्राहकांनी अनेकदा मागणी केल्यानंतर देखील सदर मीटर बदलून दिले जात नाही आणि अंदाजे रिडींग देण्यात येते त्यामुळे देखील वीजचोरी करण्यास प्रोत्साहन मिळत आहे.