पुणे हादरले..उच्चशिक्षित तरुणीने चेहरा आणि डोळे स्कार्फने झाकून चार मजली बिल्डिंगवरून घेतली उडी

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून एका उच्चशिक्षित तरुणीने चक्क चेहरा आणि डोळ्यावर स्कार्फ बांधून चार मजली इमारतीच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आहे . वाकड येथे सोमवारी (दि. २०) सकाळी सातच्या सुमारास ही घटना समोर आली असून अत्यंत सामान्य परिस्थिती असलेल्या या तरुणीच्या आत्महत्येचे नक्की कारण अद्याप समजू शकलेले नाही.

उपलब्ध माहितीनुसार, नम्रता गोकुळ वसईकर (वय २४, रा. नंदनवन कॅालनी, माऊली चौक, वाकड, मूळ रा. दराणे रोहले, ता. शिंदखेडा, जि. धुळे), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून मयत नम्रता ही सोमवारी (दि. २०) सकाळी पावणेसहाच्या सुमारास घरातून बाहेर निघाली आणि माऊली चौकातील एका चारमजली इमारतीच्या छतावर आत्महत्येच्या इराद्याने गेली.

इमारतीच्या छतावर पोहचल्यानंतर तिने चेहरा आणि डोळ्यांवर स्कार्फ बांधून घेत इमारतीच्या छतावरून तिने उडली मारली. खाली पडली तेव्हा तिच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती. पोलिसांना माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नम्रता हिच्या चेहऱ्यावरील स्कार्फ कापून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी ओळख पटली नाही त्यानंतर तात्काळ तिला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.

दुसरीकडे नम्रता घरी न परतल्याने तिच्या कुटूंबियांनी शोध सुरू केला आणि ती मिळून न आल्याने सायंकाळी उशिरा ते वाकड पोलीस ठाण्यात गेले असताना पोलिसांनी फोटो पाहून त्यांना झाल्या प्रकाराची माहिती देताच त्यांना धक्काच बसला. शवविच्छेदन करून नम्रताचा मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला तेव्हा पूर्ण परिवाराला अश्रू अनावर झाले होते .

मयत नम्रता हिचे ‘बीटेक’ (आयटी) पर्यंत शिक्षण झाले होते. तिचा लहान भाऊ देखील उच्चशिक्षित असून सहा महिन्यापूर्वी तिच्या भावाला नुकतीच नोकरी लागल्याने पूर्ण परिवार धुळे येथून पुणे इथे स्थायिक झाला होता . मयत नम्रता हिचे वडील हे चप्पल-बूट शिवण्याचे तसेच पाॅलीश करण्याचे काम करतात त्यामुळे अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण केले होते.

प्राथमिक माहितीनुसार, मयत नम्रता हिला बीटेक आयटीनंतर साॅफ्टवेअरमधील काही ‘लॅंग्वेज’ शिकायच्या होत्या मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला त्यासाठी आवश्यक अशा ३० हजार रुपयांची आर्थिक तजवीज होत नव्हती. भावाला नोकरी लागली असली तरी पगार मात्र जास्त नव्हता त्यामुळे आर्थिक अडचणींनी ती हताश झालेली होती. जर ती पुढे आणखी लँग्वेज शिकली असती तर तिला सहज नोकरी मिळाली असती असे तिला वाटत होते मात्र त्याची तजवीज न झाल्याने तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे .


शेअर करा