एकीकडे देशात कोरोनाचे संकट असताना यासाठी जबाबदार कोण यावर सर्वच जण मौन बाळगत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निशाण्यावर घेतले आहे . परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची गरज असताना मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात घेऊन आले. त्यामुळे मोदींनीच भारतात करोना आणला असं म्हटलं तर चुकलं कुठं?, असा खडा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एकीकडे वृत्तवाहिन्या याबद्दल काहीच बोलत नसताना प्रकाश आंबेडकर यांनी या निमित्ताने नव्या चर्चेला तोंड फोडले आहे .
कोरोना भारतात दाखल झाल्यानंतर देखील केंद्र सरकार संथ बसून होते ही वस्तुस्थिती आहे. ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण हा केरळमध्ये आढळला होता त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२० रोजी राहुल गांधी यांनी देखील कोरोनाबद्दल सरकारला सचेत केले होते मात्र त्यांच्या इशाऱ्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले. २४-२५ फेब्रुवारी २०२० रोजी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी नमस्ते ट्रम्प या इव्हेंटचे आयोजन करण्यात आले . केंद्राच्या या साफ चुकीबद्दल मीडिया शांत असला तरी प्रकाश आंबेडकर यांनी मात्र नरेंद्र मोदींवर टीका करून एका नवीन चर्चेला सुरुवात केली आहे . डोनाल्ड ट्रम्प ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी कोरोनाचा फैलाव जास्त झालेला आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या म्हणण्याला आधार दिसतो आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘” जेव्हा परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची आणि त्यांची टेस्टिंग करण्याची गरज होती. नेमके त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मोदींनीच भारतात करोना आणला असं म्हटलं तर चुकलं कुठे ? “
एकीकडे सर्व मीडिया आणि विरोधी पक्ष देखील मोदींना प्रश्न विचारण्याची हिम्मत दाखवत नसताना फक्त राहुल गांधी आणि प्रकाश आंबेडकर तसेच ओवेसी असे काही मोजकेच लोक मोदींना प्रश्न विचारत आहेत . आंबेडकर यांनी याआधी देखील मोदी हे धार्मिक गटाचे नेते असून त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नसल्याची टीका केली होती. लॉकडाऊनने लोकांवर उपासमारीची वेळ आलेली असून लॉकडाऊन झुगारून द्यावे असे आवाहन देखील प्रकाश आंबेडकर यांनी केले होते .
प्रकाश आंबेडकर म्हणतात, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी आणि पोलिसांसह इतर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर देशातील करोना आटोक्यात आला आहे. डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांच्या परिश्रमांमुळे करोनावर मात करता आल्याचा संदेश सरकारने द्यायला पाहिजे होता. मात्र सरकारने तसे केले नाही. आजही केवळ ५ टक्के रुग्णांसाठी ९५ टक्के जनतेला वेठीस धरण्याचं काम सुरू आहे, ते योग्य नाही. भविष्यात आर्थिक संकटाने वंचित घटकांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणूनच आम्ही लॉकडाऊन नाकारला आहे.
लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेला खिळ बसली असून तिला रुळावर आणण्याची जबाबदारी सरकारची आहे. किमान आता लोकांनी स्वत:ला वाचवण्यासाठी जनजीवन सुरू करावे. बकरी ईद, रक्षाबंधन, अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करावी. किमान रक्षाबंधनाच्या दिवशी सरकारने सार्वजनिक वाहतूक सुरू करावी, असे देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.