महाराष्ट्रात अनेक वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक घटना जालना येथे समोर आली होती. जालना येथील महिला रुग्णालयातून एक दिवसाच्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते. सदर घटना उघडकीस आल्यानंतर पूर्ण शहरात खळबळ उडाली होती आणि पोलीस दलाकडून देखील तातडीने पावले उचलण्यात आली आणि मंगळवारी पहाटे आरोपी महिलेला परभणी जिल्ह्यातील सेलू येथून ताब्यात घेण्यात आले.
सोमवारी महिला रुग्णालयात एका महिलेची प्रसूती झाली आणि तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्यावेळी तिथे शेजारी असलेल्या एका महिलेने बाळाला उन्हात बाहेर घेऊन जाते असे सांगत बाळाला बाहेर घेऊन गेली ती पुन्हा आलीच नाही. या प्रकारानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आणि सदर प्रकरणाची पोलिसात खबर देण्यात आली. पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता बाळाला पळवून नेलेली महिला हिने अंगात बुरखा घातलेला असल्याचे आढळून आल्याने तपासकामात देखील पोलिसांना बरीच मेहनत करावी लागली.
पोलीस पथकाने परभणी रेल्वेस्थानकावर जात तेथील सर्व सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून एक महिला रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका बालकासह रिक्षात जाताना आढळली आणि त्यानंतर त्या रिक्षा चालकास ताब्यात घेऊन माहिती घेतली असता त्याने या महिलेला परभणी येथील जिल्हा रुग्णालय इथे सोडल्याचे सांगितले त्यानुसार पथकाने तेथील कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता ही महिला सेलू येथील गायत्रीनगर येथे राहत असल्याची माहिती समोर आली. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन खात्री केली असता हे बालक जिल्हा रुग्णालयातून पळून गेल्याचे स्पष्ट झाले.
सदर महिलाही दुसऱ्यांच्या घरी घरकाम करत होती मात्र अनेक वर्षे होऊन देखील तिला मूलबाळ होत नसल्याने ती हतबल झालेली होती. चार ते पाच वेळा तिचा गर्भपात झाला आणि सातव्या महिन्यात देखील गर्भपात झाल्याने ती निराश झाली. तिने काहीही करून बाळ मिळवायचे या आशेपोटी जालना गाठले अन आणि तिथे जाऊन हा सर्व प्रकार केला. विशेष म्हणजे ज्या बाळाचे अपहरण करण्यात आले होते त्याच्या आईजवळ ही महिला प्रसूती नंतर बराचवेळ लुडबुड करत होती. मदतीच्या बहाण्याने तिच्या पुढे पुढे करत होती त्यामुळे बाळाच्या आईचा तिच्यावर विश्वास बसला त्यातूनच पुढे तिने हा धक्कादायक प्रकार केला.