
महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात परिटवाडी इथे उघडकीस आली असून 75 वर्षीय महिलेचा ज्वारीच्या पिकात दगडाने ठेचून खून करण्यात आलेला आहे. गुरुवारी ही घटना उघडकीस आली असून कमलबाई चांगदेव वाघ असे मयत महिलेचे नाव असल्याचे समजते.
उपलब्ध माहितीनुसार, मयत कमलबाई नेहमीप्रमाणे बुधवारी संध्याकाळी चार वाजता शेतात सरपण काढण्यासाठी गेल्या होत्या मात्र त्या संध्याकाळी घरी आल्याच नाही म्हणून नातेवाईकांनी शेतात पाहणी केली मात्र त्यांना त्या सापडल्या नाहीत त्यानंतर पुन्हा गुरुवारी सकाळी कमलबाई यांच्या शोधासाठी त्यांचा मुलगा आणि त्याचे सहकारी शेतात गेले असताना ज्वारीच्या पिकात दगडाने ठेचलेला कमलबाई यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृतदेहाच्या डाव्या बाजूच्या गालावर, कपाळावर दगडाने ठेचल्याच्या खुणा होत्या.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नगरमधून ठसे तज्ज्ञ आणि श्वानपथक देखील मागवण्यात आले होते. सदर प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे समजते.