एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे आमदार फुटले कसे असा प्रश्न अनेकांना पडत होता आणि याच प्रश्नाचे उत्तर आता औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहे. शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले असून त्यातून आमदारांसोबत घडत असलेले प्रकार त्यांनी पत्रातून मांडले आहेत.
शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातील प्रमुख दहा मुद्दे
- गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी ‘वर्षा’चे दारे बंद होती.
- शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही.
- आमच्यासाठी मंत्रालयातील सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.
- तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसल्याने कंटाळून आम्ही निघून जायचो..
- आमची व्यथा,आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी कधीच आपल्यापर्यंत पाह्चू दिली नाही.
- आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते.
- आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं ?
- विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला?
- आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत शिंदे साहेब यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे आहेत, या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
- काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणारे संजय शिरसाट यांच्या खांद्यावर जेव्हा घरची जवाबदारी आली त्यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजीपाला विकला, गॅसचे फुगे विकले आणि पुढे ते ऑटो रिक्षाचालकाचं काम करू लागले आणि शिवसेनेशी जोडले गेले आणि राजकारणात आले. जमिनीवरील नेते नि कार्यकर्ते हे ‘ सूट बूट ‘ पद्धतीत आणि कॉर्पोरेट संस्कृतीत रुळत नाहीत मात्र बाळासाहेबांनंतर शिवसेनेत या पद्धतीची सुरुवात झाल्याचे देखील बोलले जाते . शिवसेना सोडणाऱ्या अनेक जणांनी या पद्धतीवर टीका केली आहे.