‘ ह्या ‘ कारणावरून फक्त रिक्षाचालकांचेच मोबाईल तो चोरायचा ..कारण ऐकून पोलीसही चक्रावले

शेअर करा

एक तरुणाचे मूळच्या गुजरातच्या असलेल्या तरुणीशी सूत जुळले होते मात्र तिने त्याला अचानक दगा दिला आणि एका रिक्षावाल्यासोबत पळून गेली. तिने एका रिक्षाचालकाच्या नादी लागून आपल्याला दगा दिल्यामुळे त्याने सर्व रिक्षाचालकांवर सूड म्हणून त्यांचे मोबाईल चोरायला सुरुवात केली. मोबाईल असल्यानेच प्रेयसी आणि तिचा प्रियकर असलेल्या रिक्षावाल्याचे सूत जुळले अशी त्याची धारणा झाली. तब्बल ८० मोबाईल चोरल्यावर तो चोरटा पकडला गेला. घटना पुणे शहरातील असून आसिफ उर्फ बोहरा शेख असे आरोपीचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार पुणे शहरातील लष्कर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. पोलिसांनी या चोरट्याकडून तब्बल 80 चोरीचे मोबाईल हस्तगत केले असून सर्व ८० मोबाईल हे पुण्यातील रिक्षा चालकांचे आहेत.आसिफची प्रेयसी ही मूळची गुजरातची होती. दोघांची लव्हस्टोरी चांगली सुरू होती. पण, अचानक त्याच्या प्रेयसीचे काही महिन्यांपूर्वी एका रिक्षाचालकासोबत प्रेमसंबंध जुळले. आसिफला हे समजायच्या आतच तिने रिक्षासोबत पळ काढला होता. आपली प्रेयसी एका रिक्षाचालकासोबत पळून गेली हे ऐकून आसिफला जबर धक्का बसला आणि त्याने सर्व रिक्षाचालकांचे मोबाईलच गायब करायचे ठरवले .

एका पाठोपाठ एक असे करत तब्बल ८० रिक्षाचालकांचे मोबाईल त्याने चोरले मात्र अशीच एकदा चोरी करताना तो पकडला गेला. मोबाईलमुळे प्रेयसीने दगा दिला असा समज झाल्याने तो चोऱ्या करत असल्याचे सांगताच पोलीस देखील चक्रावून गेले. आसिफने चोरलेले हे सगळे मोबाईल फोन हे रिक्षाचालकांचे आहेत. मात्र प्रेमभंग झाल्यामुळे गुन्हेगारी मार्ग पत्कारणे आसिफला महागात पडले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक चंद्रशेखर भोसले करत आहे.


शेअर करा