
सोशल मीडियावर सध्या छत्रपती संभाजीनगर इथे आयोजित करण्यात आलेल्या बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमाची जोरदार चर्चा सुरू असून बुधवारी अहमदनगर येथील एका मुस्लिम कुटुंबाने हिंदू धर्मात प्रवेश केलेला आहे . जमीर शेख असे या व्यक्तीचे आधीचे नाव असून ते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी हिंदू धर्मात प्रवेश करत कुटुंबप्रमुख जमीर शेख यांनी स्वतःचे नाव शिवराम आर्य असे ठेवलेले आहे.
शिवराम आर्य यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना , ‘ आमचे आजी आजोबा जालना जिल्ह्यातील असून पूर्वीपासून आमच्या घरात देवीचे ठाणे आहे . १९७२ मध्ये आमच्या जालन्यात दुष्काळ पडला आणि त्यानंतर आम्ही पोट भरण्यासाठी नगरला आलो त्यानंतर पुन्हा जालन्यात गेलो नाही. पूर्वीपासून आम्ही हिंदू धर्माला मानत असून आमच्या घरी नेहमी पूजापाठ असायचा .’
शिवराम यांनी पुढे बोलताना म्हटले की , ‘ देवाचे नामस्मरण करायचे असे माझ्या आजी-आजोबांनी मला शिकवलेले आहे त्यामुळे बऱ्याच दिवसांपासून धर्मांतर करण्याची इच्छा होती म्हणून आम्ही हिंदू धर्मात आलेलो असून आमची घरवापसी झालेली आहे ‘. असे ते म्हणाले. स्वतःचे नाव त्यांनी शिवराम आर्य असे ठेवलेले असून ते आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व अशा एकूण नऊ जणांनी हिंदू धर्मात प्रवेश केलेला आहे.
आपल्या आधीच्या धर्माबद्दल बोलताना ते म्हणाले की , ‘ माझे जे काही नातेवाईक होते त्यांच्यापासून मी खूप लांब आहे कारण त्यांनी माझी कुठल्याही दुःखात कधी मदत केली नाही त्यामुळे आमच्या नातेवाईकांशी मला काहीही घेणेदेणे नाही . मी आणि माझे कुटुंब कृष्णभक्त असून आम्ही भगवान श्रीराम आणि सीता माताची पूजा करतो. आमच्या घरात गणपती देखील बसवतो त्यामुळे आम्हाला इतरांशी काही घेणेदेणे नाही ‘, असे देखील ते म्हणाले.