खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त .. ? : रोहित पवार यांनी साधला विरोधकांवर निशाणा

शेअर करा

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आता या योजनेची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. राज्य सरकारच्या निर्णयावर विरोधकांकडून टीका सुरु झाली असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.

जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयाचं रोहित पवार यांनी ट्विट करत स्वागत केलं आहे. “जलयुक्त शिवार योजनेची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे आभार. या चौकशीतून ही खरंच जलयुक्त योजना होती की या योजनेत पाण्याऐवजी फक्त पैसेच मुरले हे स्पष्ट होईल,” अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.

यापूर्वीही कॅगनच्या अहवालाचा हवाला देत रोहित पवार यांनी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली होती. “ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल ९६३३ कोटी रुपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल, तर हे पैसे कुठं मुरले व कुणाची पातळी उंचावली याचा तपास झाला पाहिजे,” अशी मागणी रोहित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती.


शेअर करा