मराठा समाजाच्या रास्ता रोको प्रकरणात कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देऊन केलेली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सद्य परिस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून सगे सोयरे अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात करावे या मागणीच्या पाठिंब्यासाठी सकल मराठा समाजाने श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे रास्ता रोको केलेला होता त्यासाठी पोलीस ठाणे व महसूल प्रशासन यांची परवानगी देखील घेण्यात आलेली होती.
परवानगी घेतल्यानंतर रास्ता रोको करण्यात आले मात्र पोलिसांनी 144 कलम लागू असल्याबाबत कुठलीही पूर्वसूचना किंवा नोटीस आंदोलकांना दिलेली नव्हती त्यामुळे मराठा बांधवांच्या रास्ता रोको प्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. प्रशासकीय अधिकाऱ्यांना सर्व सहकार्य समाज बांधवांनी केले मात्र पोलिसांकडून हा अन्याय करण्यात आला आहे त्यामुळे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा मराठा समाज तीव्र आंदोलन करेल , असे निवेदनात म्हटलेले आहे .