अहमदनगर शहरातील मोकळ्या प्लॉटवर तसेच रस्त्यांवर सध्या ताबा गॅंग यांचा धुमाकूळ सुरू असून शहरात ही गॅंग ‘जेव्ही ‘ नावाने ओळखली जाते. जे आणि व्ही कोण आहेत हे नगरकरांना वेगळे सांगण्याची गरज आता राहिलेली नाही. ‘ जेव्ही ‘गॅंगचे हे जॉईंट व्हेंचर सर्वसामान्य नागरिकांसाठी अक्षरश: गळ्याचा फास बनलेले असून शासकीय अधिकाऱ्यांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सहभागाशिवाय असे प्रकार शक्य नाहीत.
नगर शहरात काही जणांनी प्लॉट घेतले मात्र त्यानंतर परिस्थिती बदलल्या कारणाने इतर शहरात त्यांना जावे लागले अशा व्यक्तींच्या प्रॉपर्टी हेरून त्यावर ‘ जेव्ही ‘ गॅंग सध्या त्यांच्या टोळक्यांच्या माध्यमातून ताबा मारण्याचे काम करत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक घटना समोर आलेल्या असून काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासोबत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे विक्रम राठोड तसेच शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांनी अनेकदा या प्रकरणी आवाज उठवला आहे. निलेश लंके यांनी देखील जिल्हाधिकारी यांची या संदर्भात भेट घेऊन कारवाई करण्याची विनंती केली होती मात्र प्रशासकीय पातळीवर याविषयी उदासीनता पाहायला मिळत आहे.
एखाद्या प्लॉटसंदर्भात तक्रार आली आणि तक्रारदार पोलिसांकडे तक्रार द्यायला गेले तर पोलीस जागेसंदर्भात वाद आहे आमच्याकडे येऊ नका दिवाणी स्वरूपाचा वाद आहे असे सल्ले देतात बनावट कागदपत्रे आणि खोट्या पद्धतीने नोटऱ्या बनवून सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाच्या संपत्तीवर डल्ला मारायचा असे प्रकार शहरात सध्या ‘ जेव्ही ‘ गँगने सुरु असून पोलिसांकडे जायची सोय राहिलेली नाही तर न्यायालयात वेळ जाईल तसेच भीतीपोटी नागरिक जाण्यास टाळाटाळ करत आहेत.
वर्ग एकच्या मिळकती यांचीच कायदेशीर खरेदी विक्री सहज होऊ शकते मात्र या ‘ जेव्ही ‘ गॅंगला त्याचे कुठलेच भय राहिलेले नसून सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून वर्ग एक काय , वर्ग दोन काय आणि वर्ग तीन काय जिथे दिसेल तिथे डल्ला मारून आपल्या टोळक्यांची घरे भरून द्यायची त्यामध्ये आपलाही स्वार्थ साधायचा अशा पद्धतीने सध्या शहरात धुमाकूळ सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही काळ ही गॅंग शांत राहिलेली होती मात्र आता निवडणूक झाल्यानंतर पुन्हा ‘ जेव्ही ‘ गॅंग डोके वर काढील की काय अशी भीती सामान्य नागरिकांच्या मनात आहे.