बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत.
सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मोक्का कायद्यांतर्गत खटला चालणार आहे. एसआयटीने हा मोक्का लावला असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धारशिवमधील आक्रोश मोर्चातून धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे .
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील ?
तुमची गाठ मनोज जरांगे यांच्याशी आहे. २५ जानेवारीनंतर तुमची मस्ती उतरवणार. जर या पुढे मराठ्यांना त्रास झाला तर सामना मनोज जरांगे यांच्याशी आहे. तुमची टोळी थांबवा. ही धमकी नाही तर सावध करत आहे. तुमच्या गुंडांनी कोणाला त्रास दिला तर लक्षात ठेवा त्यांचा बंदोबस्त आम्ही करणार आहोत. तुमचे पाप झाकण्यासाठी पांघरुन घेऊ नका.
मी मागे लागलो तर पाणी पाजल्याशिवाय सोडत नाही. मी २५ तारखेपर्यंत काहीच बोलणार नाही त्यावेळी उपोषण केल्यावर मराठा समाजास आरक्षण मिळाल्यावर मग धनंजय मुंडे यांना पाहतो. संतोष देशमुख प्रकरणातील खून प्रकरणातील आरोपींवर मकोका लागला आहे. पण जर खंडणीतील आरोपीला मकोका लागला नाही तर आम्हाला हा मकोका मान्य नाही. खंडणीतील आरोपीवर मकोका लागला पाहिजे. खंडणीमुळेच हा गुन्हा घडला आहे. त्यामुळे खंडणीतील आरोपी हे खुनाच्या गुन्ह्यात आले पाहिजे. मुख्यमंत्री साहेब तुम्ही कुटुंबाला शब्द दिला तो पाळा.
मराठा बांधवांनी एकमेकांना मदत करा नाहीतर मुडदे पडतील, आपल्या लेकी बाळे संपतील. किती दिवस आपण मुक्क्याप्रमाणे बसणार आहात. हे मुठभर आहेत त्यांचा माज उतरवण्यास वेळ लागणार नाही. संतोष देशमुख यांना न्याय मिळत नाही, तर यापुढे सावध राहा. मी त्यांना मोजत नाही. कधी मोजणार नाही. मी मृत्यूस घाबरत नाही. तुम्हाला मरा म्हणून सांगणार नाही. परंतु तुम्ही बेफीकर राहू नका. या लोकांना नीट करण्याचा सर्व गोष्टी मराठ्यांचा हातात आहे. ही लोक धनंजय देशमुख यांना धमकी देत आहेत आणि आम्ही गुंडांना बोलायचे नाही का? आता जशाच्या तसे उत्तर द्यावे लागणार आहे. आमच्या संतोष देशमुख यांच्या जीव घेतला, त्यानंतर तुमचे समाधान झाले नाही. प्रतीमोर्चा काढण्याचे सांगत आहात. हे लक्ष मस्तीत वागू लागत आहे. त्यांच्या मुजोरपणामुळे त्यांनी पत कमी करुन घेतली आहे.