बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं तसंच या प्रकरणी कठोरात कठोर कारवाईसाठी वेगवेगळ्या शहरातून सर्वपक्षीय मूक मोर्चेही काढण्यात येत आहेत.
सध्या अटकेत असलेल्या आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे ,महेश केदार आणि जयराम चाटे अशा आठ जणांवर मकोका कायद्यांतर्गत खटला चालणार असून वाल्मीक कराड याच्यावर देखील मकोका लावण्यात आला आहे.
वाल्मीक कराड याच्यावर मकोका कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे वृत्त येताच कराडच्या समर्थकांचा परळी शहरात धुमाकूळ सुरू झाला आहे. वाल्मीक कराड याच्या काही कार्यकर्त्यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला त्यात ते भाजलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाल्मीक कराड याला आजपासून सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. वाल्मीक कराड याला पोलीस कोठडीचा निर्णय न्यायालयाने देताच त्याच्या समर्थकांनी न्यायालयाच्या आवारात धुमाकूळ घातला.
सीआयडीने वाल्मिक कराडच्या रिमांड रिपोर्टमध्ये मोठा दावा केला असून सरपंच संतोष देशमुख अडथळा ठरले म्हणून आरोपींनी त्यांची हत्या केली असा दावा सीआयडी आणि एसआयटीने कोर्टात केला आहे. सुदर्शन घुले, वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी आवादाच्या अधिकाऱ्यांना धमकावूनही कंपनीने त्यांना खंडणी दिली नव्हती. आवादा कंपनीची बाजू घेत संतोष देशमुखांनी सुदर्शन घुलेला आव्हान दिलं होतं. खंडणीला अडथळा ठरले म्हणून वाल्मिक कराड आणि इतर आरोपीनी संतोष देशमुखांची हत्या केली, असा दावा सीआयडीकडून करण्यात आला आहे आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना देखील वाल्मिक कराडने धमकी दिल्याचं याधीच स्पष्ट झालं आहे. आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी शिवाजी थोपटे यांना वाल्मिक कराड याने थेट धमकी देत 2 कोटींची खंडणी मागितली असल्याचेही यापूर्वी समोर आले होते.