चला चला सकाळ झाली सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकायची वेळ झाली , आयुक्त साहेब कारवाई कधी करणार ?

शेअर करा

अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी काही दिवसांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा दिलेला होता मात्र अद्यापपर्यंत कुठेही दंडात्मक कारवाई झालेली नसले कारणाने शहरातील रस्त्यांवर कचऱ्यांचे ढिगारे पाहायला मिळत आहेत. 

अनेक ठिकाणी पहाटेच्या सुमारास अंधार असताना काही नागरिक परिसरातील कचरा आणून टाकतात आणि सकाळी त्यांनी अस्ताव्यस्तपणे टाकलेला कचरा जमा करण्याची वेळ महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांवर येते. घंटागाडी अनेक प्रभागात व्यवस्थित पोहोचत असली तरीही काही नगरकरांना लागलेली खोड मोडण्यासाठी मनपा आयुक्त आता काय पावले उचलतील ? याकडे नगरकरांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 

आपण टाकलेला कचरा उचलणारा व्यक्ती देखील माणूसच आहे याची भावना अशिक्षितच नव्हे तर काही मुजोर धनदांडग्या व्यक्तींमध्ये राहिलेली नसून त्यातून असे प्रकार होत आहेत. व्यवसायिक किंवा घरगुती स्वरूपाचा कचरा साठवून ठेवून महापालिकेची गाडी आल्यानंतर घंटागाडीत जमा करणे हे आपले कर्तव्य आहे याचा काही उद्दाम नागरिकांना विसर पडलेला आहे. मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी दंडात्मक स्वरूपाची एखादी कारवाई केली तर नागरिकांच्या वर्तनात बदल होण्याची अपेक्षा आहे. 


शेअर करा