राजकारणात कधी काय होईल कोणी सांगू शकत नाही. ज्यावेळेस राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी पुन्हा कधी शिवसेनेसोबत येतील अशी चिन्हे वाटत नव्हती मात्र राज ठाकरे यांनी मराठी आणि महाराष्ट्रासाठी पुन्हा एकत्र येण्याची तयारी दर्शवलेली असून उद्धव ठाकरे यांनी देखील मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणे दूर ठेवणार असल्याचे सांगितले आहे.
एका मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी ,’ महाराष्ट्र खूप मोठा आहे. महाराष्ट्र , मराठी माणसाची अस्मिता आणि अस्तित्व यांच्यासमोर आमच्यातील भांडणे वाद हे अत्यंत शुल्लक आहेत. आम्ही एकत्र येणे फार कठीण आहे असे वाटत नाही ,’ असे म्हटलेले आहे.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची तयारी दाखवली मात्र तडजोड चालणार नाही असे देखील म्हटलेले आहे. ‘ भाजप सोबत जा किंवा इतर किंवा माझ्यासोबत या पण इतर कुणालाही घरी बोलावून गाठीभेटी घ्यायच्या नाहीत,’ असा इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.