एकीकडे लाडकी बहिणी योजनेचे निकष सातत्याने बदलले जात असून त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा देखील महायुती सरकारच्या अडचणी वाढवत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नाला बगल दिल्याचे कोल्हापूरमध्ये दिसून आले आहे.
कोल्हापूरमधील एका कार्यक्रमात अजित पवार यांना कर्जमाफी वरून माध्यमानी प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी ,’ कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते ? मी दिले होते का ? असा प्रति प्रश्न माध्यमांना केला मात्र सहा नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्रवादी घोषणापत्र या नावाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता त्यात कर्जमाफीचे आश्वासन देण्यात आले होते त्यामुळे आता अजित पवारांनाच या घोषणा पत्राचा विसर पडला आहे का ?, असा प्रश्न शेतकरी बांधव उपस्थित करत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी ,’ मुख्यमंत्र्यांनी आणि अनेक मंत्र्यांनी कर्जमाफीची खोटी आश्वासने दिली आहेत. राज्यात दररोज सात शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. शेतकऱ्यांच्या लेकरा बाळांना अनाथ करून त्यांच्या पत्नीचे कुंकू पुसण्याचे पाप केले जात असून महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पाळावे ,’ असेही ते पुढे म्हणाले.