नगरमध्ये लॉकडाऊनबद्दल भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे काय म्हणाले ?

शेअर करा

करोनाच्या सुरवातीच्या काळात लॉकडाऊनचा आग्रह लावून धरलेले नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही आता लॉकडाऊन नकोच, अशी भूमिका घेतली आहे. ‘ या टप्प्यात लॉकडाऊन करण्याची गरज नाही, असे खासदार या नात्याने आपले मत आहे,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

लॉकडाऊन वरून त्यांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हा प्रशासनासोबत खटकेही उडाले होते. करोनाची स्थिती हातळण्यासाठी लॉकडाऊन हाच प्रभावी उपाय असल्याची भूमिका त्यांनी त्यावेळी घेतली होती. ‘ प्रशासन ऐकणार नसेल तर आपल्याला बैठकांना बोलवू नये ‘ असे सांगत त्यांनी काही बैठकांना हजेरी देखील लावली नव्हती.

आता पुन्हा एकदा करोनाचे रुग्ण वाढत असल्याने काही जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. तर काही जिल्ह्यांत निर्बंध कडक करण्यात येत आहेत. नगर जिल्ह्यातही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे येथेही दक्षता घेण्यास सुरवात झाली आहे. नगरमध्ये लॉकडाऊन ‘ नको ‘असे सामान्य नागरिकांचे मत आहे, मात्र पुढे काय होणार याबाबत सर्वजण साशंक आहेत.

लॉकडाऊनबद्दल खासदार सुजय विखे यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, ‘मला वाटते आता लॉकडाऊनचा काही उपयोग होणार नाही. लोकांनी स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. लोकांनी शिस्त पाळली तर यातून बाहेर पडण्याचा मार्ग निघेल. मात्र, सध्या ज्या पद्धतीने लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रम होत आहेत, तेथील गर्दी टाळली पाहिजे. जर जीवन सुरळीत होत चालले आहे तर लॉकडाऊन हा काही यावरील उपाय नाही. ‘

खासदार पुढे म्हणाले, ‘ आता कोठे लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारत आहे, व्यवसाय सुरळीत होत आहेत, अशा परिस्थिती लॉकडाऊन करून उपयोग नाही. त्यामुळे आता लॉकडाऊन करू नये, असे खासदार या नात्याने माझे मत आहे. डॉक्टर या नात्याने सांगतो की प्रत्येकाने आपली आणि कुटुंबाची काळजी घ्यावी. मला जाणवते की यावेळची जी लाट आहे, ती फार गंभीर नाही. पूर्वीपेक्षा मृत्यूदर कमी आहे. तरीही आपण काळजी घेणे आवश्यक आहे. स्वयंशिस्त पाळून आपण यातून बाहेर पडू शकतो ‘


शेअर करा