खळबळजनक..अखेर ‘ तो ‘ खून विवाहबाह्य संबंधातूनच मात्र ..

शेअर करा

विवाहबाह्य संबंधाची माहिती उघड करण्याची धमकी देणाऱ्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडली आहे. देगलूर तालुक्यातील कुडली या गावातील ही घटना असून या गावातील एका विवाहित महिलेचे एका अविवाहित तरुणासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याबाबत गावातील आणखी एका व्यक्तीला माहिती होती. तो आपल्या विवाहबाह्य प्रेम प्रकरणाबाबत कुठे वाच्यता करेल या भीतीने त्याचा खून करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी जोडप्याला अटक केली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील पोलीस ठाणे मरखेल अंतर्गत येणाऱ्या मौजे कुडली येथे विवाहबाह्य संबंधाचा उलगडा करणाऱ्या एका 27 वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. मौजे कुडली येथील रहिवासी हानमंत पुंडलिक जाधव यांचा मुलगा जगदीश (वय 27) हा 1 जानेवारीपासून घरातून निघून गेला. नातेवाईकांकडे शोध घेतल्यानंतरही तो कुठेच सापडला नाही. त्यामुळे 6 जानेवारीला त्यांनी पोलीस ठाणे मरखेल येथे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली .

25 फेब्रुवारीला कुडली शिवारात एका अनोळखी इसमाच्या डोक्याची कवटी आढळून आल्याची माहिती मरखेल पोलिसांना मिळाली. पोलीस ठाणे मरखेलचे सहपोली निरीक्षक आदित्य लोणीकर आणि पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. यावेळी चंदरबाई जाधव यांच्या शेतातील वाढलेल्या गवतात माणसाच्या अवयवाची काही हाडे, कपडे चप्पल आढळून आले. यावेळी पोलिसांनी जगदीश याचे वडील पुंडलिक जाधव यांना घटनास्थळी बोलावून घेतले. तेव्हा कपड्यावरुन त्यांनी आपलाच मुलगा असल्याची ओळख पटली.

नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्या नेतृत्तवात पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवली. मृत जगदीश यांच्या शेजारी असलेली विवाहित महिला अनुसया संतोष गोंदे (वय 27) आणि त्याच गावात राहणारा शुभम मोहन चिलमपाढे (वय 22) यांच्यात प्रेम सूत जुळले. विवाहबाह्य ही प्रेम कहाणी शेजारी राहत असलेल्या जगदीशला कळाली त्यानंतर जगदीश याने याबाबतची वाच्यता गावच्या माहिती पटलावर करण्याचे ह्या दोघांना सांगितले.

प्रेमाचा उलगडा होणार, अशी भीती अनुसया गोंदे आणि शुभम चिलमपाडे यांना होती. यातच त्या दोघांनी मिळून जगदीशचा काटा काढायचं ठरवलं. त्यानंतर या दोघांनी जगदीशचा विश्वास संपादन करुन 2 जानेवारीला मध्यरात्री त्याला कुडली शिवारात घेऊन गेले. त्याच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्याच्या गुप्तांगावर, डोक्यावर आणि चेहऱ्यावर लाथाबुक्क्यांनी वार केले. त्यानंतर गळा आवळून त्याचा खून केला. ही घटना लपवण्यासाठी त्याचा मृतदेह चंदरबाई जाधव यांच्या शेतात नेऊन टाकण्यात आले, अशी कबुली स्वत: आरोपींनी दिली असून त्यांच्यावर कलम 34/2021 नुसार 302, 301, 34 गुन्हे देखल केले आहेत. याप्रकरणी देगलूर न्यायालयाने त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.


शेअर करा