धक्कादायक..जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा मृत्यू

शेअर करा

जंतनाशक गोळी दिल्यानंतर चिमुरडीचा अकस्मात मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात आष्टी येथील लोणी सय्यद मीर या गावात घडलेला आहे . प्रांजल अंकुश रक्ताटे (एक वर्षे दहा महिने) असे मृत्यू झालेल्या चिमुरडीचे नाव असून या चिमुरडीची उत्तरीय तपासणी अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उशिरापर्यंत सुरू होती. अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण अधिक स्पष्ट होणार आहे.

प्रांजलचे काका भाऊसाहेब रक्ताटे काय म्हणाले ?

लोणी सय्यद मीर या गावात जिल्हा आरोग्य यंत्रणेचे उपकेंद्र आहे. ते बंद असल्याने जंतनाशक गोळ्या गावातील मारूती मंदिरात आशासेविकांच्या माध्यमातून वाटण्यात आल्या. मुलांच्या पालकांच्या हाती गोळ्या देऊन घरी गेल्यावर मुलांना द्या, असे सांगण्यात आले. परंतु या गोळ्या कशा घ्यायचे हे सांगण्यात आले नाही. गोळ्या घरी घेऊन आल्यावर प्रांजल हिला पूर्ण गोळीतील अर्धी गोळी दिली.

तिला गोळी दिल्यानंतर ती जमिनीवर कोसळली आणि तिने अंग सोडून दिले. त्यानंतर तिला गावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून नगर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. गोळीमधील उर्वरीत गोळी तशीच आहे.

आरोग्य यंत्रणेचे काय आहे म्हणणे ?

खुंटेफळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी विनोद जोगदंड म्हणाले, ”जंतनाशक गोळ्या वितरणाची मोहीम एक मार्चपासून सुरू आहे. गावात अशाप्रकारे कोणालाही त्रास झालेला नाही. गावात राहिलेल्या मुलांसाठी आज गोळ्यांचे वितरण केले. या प्रकारची माहिती वरिष्ठांना दिली आहे”.

उत्तरीय तपासणी करणारे जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक तपासणीत प्रांजलच्या श्‍वसनलिकेत गोळी अडकल्याचे दिसले नाही. परंतु तिच्या फुप्फुसाला सूज होती. संपूर्ण अहवाल येण्यास आठ दिवस लागतील. ‘व्हिसेरा’ राखून ठेवल्याचे सांगितले.


शेअर करा