… आणि उच्चभ्रू कुटुंबातील ‘ त्या ‘ तरुणावर एका रात्रीत विवाह उरकायची वेळ आली

शेअर करा

पुण्यातील एका नामवंत कंपनीत काम करीत असताना आयटी इंजिनीअर तरुण आणि तरुणीमध्ये प्रेमसंबंध जुळले. विवाह करणार असल्याचे सांगून दोन वर्षांपासून तरुणाने वेळोवेळी तरुणीशी शारीरिक संबंध ठेवले. तरुणीने विवाह करण्याची मागणी अनेकदा केल्यावर तो घरच्यांचा विरोध असल्याचे सांगून टाळाटाळ करत असे मात्र त्याचा हा खोटेपणा तरुणीच्या लक्षात आला आणि त्यानंतर तिने येरवडा पोलिस ठाणे गाठून तरुणाविरोधात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तरुणाला पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन हकीकत जाणून घेतली. बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई होणार असल्याचे सांगितल्यावर तरुणाची भंभेरी उडाली आणि त्याने आपण विवाहाला तयार असल्याचे सांगत रात्रीतच विवाह उरकून टाकला.

अक्षय आणि अनिता (दोघांची नावे बदलली आहेत) उच्चशिक्षित असून अक्षय (वय ३०) उत्तरप्रदेशचा तर अनिता (वय २५) महाराष्ट्रात राहणारी आहे. दोघेही कामानिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. पुण्यातील एका नामवंत आयटी कंपनीमध्ये दोघे मोठ्या पदावर नोकरीला आहेत. कंपनीत एकाच ठिकाणी नोकरीला असल्याने दोघांचे दोन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध जुळले. अक्षयने अनिताला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

अनिताने लग्नाचा विषय काढल्यावर अक्षय घरच्यांच्या विरोधाचे कारण सांगून टाळाटाळ करू लागला. अनिताने अनेकदा त्याची मनधरणी, विनंत्या केल्या; पण तो लग्न करणार नसल्याचे सांगत होता. त्यामुळे हतबल होऊन अनिताने शनिवारी सकाळी कोंढवा पोलिस ठाणे गाठले. महिला अधिकाऱ्यांनी हकीकत जाणून घेतल्यावर येरवडा हद्दीत प्रकार घडला असल्याने त्यांनी येरवडा पोलिस ठाण्यात पाठविले.

येरवडा पोलिस ठाण्यात तिचा जबाब घेण्यात आला. बलात्काराचा गुन्हा दाखल होणार असल्याने पोलिसांनी तरुणाला तातडीने पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. पोलिसांनी चौकशी केल्यावर तरुणाने चुकांची कबुली दिली. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होऊन अटक आणि कारागृहाची हवा भोगावी लागण्याचे परिणाम त्याला पोलिसांनी सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने सायंकाळी वकिलांना पोलिस ठाण्यात बोलावून घेऊन चर्चा केल्यावर शनिवारी रात्री अकरा वाजता हिंदू धर्माप्रमाणे तरुणीशी विवाह केला.


शेअर करा