“…त्याचा मृत्यूही दुसऱ्याच दिवशीच झाला होता “, नाना पटोलेंनी व्यक्त केली शंका

शेअर करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरावर हेलिपॅड आहे पण त्याच्या वापरास परवानगी मिळत नाही. तसेच शेतकरी आंदोलनामुळे मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स बाजारात घसरत असल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यातून सहानुभूती मिळावी आणि सुरक्षेचे कारण पुढे करून हेलिपॅडलाही परवानगी मिळावी यासाठी भारतीय जनता पक्षानेच स्फोटकांच्या गाडीचे प्रकरण घडवून आणले आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

२००९ मध्ये देखील अनिल अंबानी यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड करून घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणात ज्याचे नाव समोर आले त्याचाही मृत्यू दुसऱ्याच दिवशी झाला होता, याची आठवणही नाना पटोले यांनी करून दिली. राज्यात व देशात असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा होऊ नये म्हणून भाजप आमदारांनी या मुद्यावर गोंधळ घालून अधिवेशनाचा वेळ वाया घालवला असल्याची टीका देखील नाना पटोले यांनी केली.

मुंबईत मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांसह एक स्कॉर्पिओ कार पार्क करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यात संबंधित स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरन यांचा मृतदेह सापडला असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनलं आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

राज्य सरकारने दोन्ही घटनांचा तपास एटीएसकडे दिला असतानाच केंद्रीय गृहमंत्रालयाने यात एंट्री घेत स्फोटकांप्रकरणी तपास राष्टीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवला आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राज्य विधीमंडळात तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. विरोधी पक्ष भाजपने सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यावरूनच नाना पटोले आक्रमक झाले असून त्यांनी या विषयी बोलताना भाजपवर पलटवार केला आहे.


शेअर करा