नागपूर मनपा आयुक्तांच्या ‘ त्या ‘ आदेशाने नागपूरकरांची चिंता वाढली

शेअर करा

महाराष्ट्रातून समोर येणारी कोरोनाची आकडेवारी प्रशासन आणि नागरिक दोघांचंही टेन्शन वाढवणारी आहे. नागपूरमध्ये देखील कोरोनाच्या वाढत्या केसेस मुळे लॉकडॉऊन लागू करण्यात आला आहे. याठिकाणी लॉकडाऊनचा आजचा तिसरा दिवस आहे. नागपूरमध्ये 21 मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. लॉकडाऊनमुळे नागपूरकरांच्या अडचणीत रोज भर पडताना दिसत आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मनपा आयुक्तांच्या सुधारित आदेशानुसार स्टँड अलोन स्वरूपाची किराणा, भाजीपाला, फळे, मांस दुकाने आता दुपारी फक्त 1 वाजेपर्यंतच सुरु राहतील. शिवाय एकाच ठिकाणी सलग असणारी किराणा, भाजीपाला, फळे, मांस दुकाने बंद ठेवावी लागणार आहेत.

नागपुरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे 15 मार्च ते 21 मार्च 2021 दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मात्र किराणा, भाजीपाला यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या दुकांनांमध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळते आहे. त्यावर आळा घालण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी.यांनी हे सुधारित आदेश जारी केले आहेत. नागरिकांनीही सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

दरम्यान नागपूरमध्ये सलग चौथ्या दिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येने दोन हजारचा आकडा पार केला आहे. लॉकडाऊन असून देखील वाढणारी ही कोरोनाची आकडेवारी चिंताजनक आहे. गेल्या 24 तासात नागपूरमध्ये 2587 नवे कोरोना व्हायरस रुग्ण आढळून आले. तर 18 जणांचा मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारीही त्यामुळे वाढते आहे. सद्यस्थितीत नागपुरात 18 हजार 980 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.


शेअर करा