नगरमध्ये परप्रांतीय वाळू माफियांची मुजोरी, पाच जणांना ठोकल्या बेड्या

शेअर करा

जिल्ह्यातील वाळू माफियांवरून राजकीय आरोप सुरू असताना श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी नदीच्या पात्रात वाळू उपसा करणारी परप्रांतीय टोळी पकडण्यात आली. त्यांच्यासह स्थानिक साथिदारांनाही अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्रशासन कोरोना संबंधीच्या उपयाययोजनांमध्ये व्यस्त आहे. अनेक ठिकाणी वाळू उपशाचे लिलावही झालेली नाहीत. जेथे झाले तेथे सरकारच्या अघोरी नियमावलीमुळे प्रतिसाद मिळालेला नाही.

अशा परिस्थितीत बांधकाम व्यावसायिकांची गरज भागवण्यासाठी बेकायदा वाळू उपसा मात्र मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. राजकारण्यांच्या आश्रयाने वाळू चोरीच्या टोळ्या सक्रीय असल्याचे बोलले जाते. मात्र आता थेट परप्रांतीय टोळ्याही नगर जिल्ह्यात येऊन वाळू उपसा करून लागल्याचे उघड झाले आहे. अर्थात त्यांनाही स्थानिक मंडळीची साथ असल्याचे सांगण्यात येते.

श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात वाळू उपसा सुरू होता. अजस्त्र यंत्रांच्या सहाय्याने नदीपात्रात रस्ते करून, खड्डे खोदून वाळू भरून नेली जात होती. याची माहिती मिळाल्यानंतर श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके व राहुल मदने यांच्या पथकाने तेथे छापा घातला. तेथून पाच जणांना अटक करण्यात आली.

सुनीलकुमार चुरामन महतो (वय २४, मूळ रा. झाडखंड राज्य, सध्या नाशिक), मनजीत सिंग धुप्पड (रा. आनंदवली, नाशिक), अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा (वय २४ रा. मध्य प्रदेश राज्य), युवराज सिंग केशर सिंग भंडारी (वय ४०, डेहराडून) व रवी धुप्पड (रा. श्रीरामपूर ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २ पोकलेन यंत्र, १ बुलडोझर, १ ट्रक, वाळू असा सुमारे १ कोटी ८३ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एक आरोपी फरारी आहे. या सर्वांविरूद्ध श्रीरामपूर पोलिस ठाण्यात संगनमताने वाळू चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर जिल्ह्यातील गोदावरी, मुळा आणि प्रवरा नदीतील वाळू बांधकामासाठी चांगली मानली जाते. त्यामुळे दूरवरून या वाळूला मागणी असते. यासह भीमा नदीच्या पात्रातही मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू असतो. यावर कारवाई महसूलच्या अधिकाऱ्यांनी करायची की पोलिसांनी, हा मुद्दा मात्र नेहमीच उपस्थित केला जातो. कारवाईसाठी गेलेल्या पथकावर वाळू तस्करांनी हल्ले केल्याच्या घटनाही नगर जिल्ह्यात घडतात. तर कारवाईवरून दोन यंत्रणांमध्ये वादाचे प्रसंगही अनेकदा झाले आहेत.


शेअर करा