‘ होय माझी चूक झाली ‘, इम्तियाज जलील का म्हणाले ?

शेअर करा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबादमध्ये ३१ मार्चपासून सुरू होणारा लॉकडाऊन रद्द करण्यात आला आहे. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याबद्दलची माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसोबत पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द करत असल्याची घोषणा केली. मात्र या नंतर इम्तियाज जलील यांचे समर्थक आणि ते स्वतः रस्त्यावर आले आणि त्यांनी मिरवणूक काढली, त्यानंतर त्यांच्यावर सर्वच थरातून टीका झाली.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी इम्तियाज जलील यांच्या ऑफिससमोर मोठी गर्दी करत जल्लोष केला. यावेळी कार्यकर्त्यांनी इम्तियाज जलील यांना पुष्पहार घालून रस्त्यावर मिरवणूक सुद्धा काढली होती. इम्तियाज जलील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडला. इम्तियाज जलील यांच्यावर सर्व स्तरावरुन टीका करण्यात आली. यानंतर इम्तियाज जलील यांनी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना इम्तियाज जलील म्हणाले की, होय माझी चूक झाली. कायद्यानुसार जरुर कारवाई करा. सर्वसामान्यांना जो कायदा आहे त्यानुसार माझ्यावरही कारवाई करा. मात्र मीच काय तर देशातील अनेक नेते नियम मोडतात. त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी देखील इम्तियाज जलील यांनी केली आहे.

औरंगाबादमध्ये ३० मार्च ते ८ एप्रिल दरम्यान लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यात काहीसा बदल करून ३१ मार्च ते ९ एप्रिल दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. उद्यापासून लॉकडाऊन सुरू होणार असल्यानं गेल्या २ दिवसांपासून बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड उडाली होती. मात्र आज जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांसह पत्रकार परिषद घेत लॉकडाऊन रद्द केल्याची घोषणा केली.

औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयाला विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून मोठा विरोध केला होता. इम्तियाज जलील यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. औरंगाबाज जिल्ह्यात लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयाविरोधात इम्तियाज जलील यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. ३१ मार्चला लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा जलील यांनी केली होती.


शेअर करा