मोदी दिसायला सलमान मात्र प्रत्यक्षात एकदम सुपरफ्लॉप , तुमची लायकी नाही राजीनामा द्या

शेअर करा

देशामध्ये करोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून रुग्ण संख्या प्रचंड वाढत आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून लोकांना योग्य वैद्यकीय उपचार मिळणे अवघड होत चालले आहे. वैद्यकीय उपचारांअभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर सिनेसमीक्षक आणि अभिनेता कमाल खान याने मोदी सरकारवर टीकास्र सोडले आहे.

केंद्र सरकारला देशातील करोनाची स्थिती हाताळण्यात कमालीचे अपयश आले आहे. वैद्यकीय व्यवस्थेवरही कमालने आपल्या ट्विटमधून प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील सद्यस्थितीबद्दल दोन ट्विट करत कमाल खानने आपले मत व्यक्त केले आहे.

कमाल खान म्हणतो, ‘आज देशाची जी भयावह अवस्था झाली आहे, त्याला सर्वस्वी मोदी सरकार जबाबदार आहे. गेल्या ७० वर्षांत या देशात जे झाले नाही, ते मी करून दाखवणार अशी वक्तव्य सातत्याने मोदीजींनी केली आहेत. त्यांनी हे खरोखरच करून दाखवले आहे. देशाची वाट लावली आहे आणि देशातील नागरिकांना रस्त्यावर मरणासन्न अवस्थेत सोडून दिले आहेत आणि या नागरिकांमध्ये जास्त करून भक्तमंडळीच आहेत.’

याच संदर्भात कमाल खानने आणखी एक ट्विट केले आहे. त्यात त्याने लिहिले, ‘आपले पंतप्रधान अगदी सलमान खानसारखे झाले आहेत. जे दिसायला तर अगदी कठोर आहेत, स्वतःला सुपरस्टार मानतात परंतु वास्तवात मात्र एकदम सुपरफ्लॉप आहेत.’ कमाल खान याने आधीदेखील मोदींवर टीका केलेली आहे. केंद्राची धोरणे ही देशाला घातक असल्याचे कमाल खान याने आधीही म्हटले आहे .

देशात करोनामुळे जी स्थितीत उद्भवली आहे त्याबद्दल कमाल खानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्याने लिहिले आहे, ‘मला तर विश्वासच बसत नाही की हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना ऑक्सिजन आणण्यास सांगितले जात आहे. अशा स्थितीमध्ये काही थोर लोक सांगत आहेत की आपल्या देशाचा अभिमान बाळगा. परंतु ही परिस्थिती अभिमान करण्याची नाही तर चिंता करण्याची आहे. त्याचप्रमाणे मरायला टेकलेल्या व्यवस्थेला मजबूत करण्याची वेळ आली आहे.’

दरम्यान, अलिकडेच ऋचा चढ्ढाने देखील सरकारी व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. तिने म्हटले होते की, आपल्याकडे २० स्मार्ट शहरे आहेत, आपण महाशक्ती होण्याकडे वाटचाल करत आहोत आणि आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलीयन इतकी आहे. तुम्ही असे नक्कीच म्हणू शकता परंतु वास्तवामध्ये यात काहीच तथ्य नाही. आजच्या स्थितीमध्ये आपल्याकडे ऑक्सिजनचे सिलेंडर नाही, औषधांचा साठा, व्हॅक्सिन, रुग्णांवर उपचासाठी बेड पुरेसे नाही. इतकेच नाही तर स्मशानामध्ये अंत्यविधी करण्यासाठी लाकडे देखील पुरेशा प्रमाणात नाही, असे म्हणत तिने एकूणच सरकारवर टीका केली होती.


शेअर करा