‘ मी तुमच्या आईला पळवून नेलं ’, अखेर दोन भावंडांनी केला मास्टरप्लॅन

शेअर करा

‘मी तुमच्या आईला पळवून नेलं’, अशा शब्दात खिजवणाऱ्या इसमाची गोंदियातील दोन भावंडांनी मिळून चाकूने भोसकून हत्या केली आहे. संबंधित घटना ही गोंदिया जिल्ह्यातील मुरपार येथे घडली आहे. मृतक व्यक्तीचं नाव जयप्रकाश बसंतलाल लिल्हारे (वय 45 ) असं आहे. आरोपी कोमल रामचंद्र रणगिरे आणि रुपेश रामचंद्र रणगिरे या दोघी भावांनी जयप्रकाशची हत्या केली. जयप्रकाश याचे आरोपींच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. त्याच वादातून संबंधित घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. सोमवारी (10 मे) दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मुरपार गावापासून काही अंतरावर शेतात असलेल्या झोपडीत जयप्रकाशची हत्या केली

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी जयप्रकाशची हत्या का केली? याचा तपास सुरु केला आहे. या हत्येमागे प्रमुख दोन कारणं असल्याचा अंदाज वर्तवला जातोय. मृतक जयप्रकाशचं गेल्या तीन-चार वर्षांपासून आरोपींच्या आईसोबत अनैतिक संबंध होते. सुरुवातीला ते जेव्हा संबंधात होते तेव्हा त्याने मुलांच्या आईला नागपुरात पळवून नेलं होतं. तिथे त्याने दोन वर्ष काढले. त्यानंतर तो महिलेसह पुन्हा त्याच्या मुळगावी मुरगाव इथे आला होता.

जयप्रकाश महिलेसोबत मुरपार गावापासून काही अंतरावर शेतात एका झोपडीत राहू लागला. तो गेल्या वर्षभरापासून तिथे राहत होता. या दरम्यान तो महिलेच्या मुलांना वारंवार छेडायचा. तुमच्या आईला मी पळवून नेलं, अशा शब्दात तो मुलांना खिजवायचा. याच रागातून मुलांनी त्याची हत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय.

आरोपीच्या वडिलांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यांचे नाव रामचंद्र रणगिरे असं होतं. ते आपल्या दोन्ही मुलांसह गावात वास्तव्यास होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विमा पॉलिसीचे साडेतीन लाख रुपये मिळणार होते. मात्र, त्या विमा पॉलिसीवर मुलांची आई ही वारसदार होती. कागदोपत्री आईचं नाव असल्याने तिच्या स्वाक्षरीशिवाय ते पैसे मिळणे अशक्य होतं. याच विषयांवरुन मुलं, त्यांची आई आणि जयप्रकाशमध्ये वाद सुरु होता, अशी माहिती समोर आलीय. आता हत्येमागील नेमकं कारण काय ? याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.


शेअर करा