औरंगाबाद येथील एका विवाहित महिलेने आपल्या सोबतच लग्न करावे याकरिता तिच्या सहा महिन्याच्या वर्षाच्या मुलाचे अपहरण करून कार मधून घेऊन चाललेल्या एका व्यक्तीला श्रीगोंदा पोलिसांनी नगर दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथे बुधवारी नऊ तारखेला अटक केली. मुलाची त्याच्या ताब्यातून सुटका करून मुलाला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
उपलब्ध माहितीनुसार, सागर गोरख आळेकर राहणार श्रीगोंदा असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी दिलेल्या सागर आळेकर याच्या विरोधात वाळूज जिल्हा औरंगाबाद एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .संबंधित महिलेचे व आळेकर यांचे प्रेम संबंध होते त्यामुळे तिने आपल्याशीच लग्न करावे यासाठी आळेकर याने बुधवारी सकाळी औरंगाबाद इथे त्याने मुलाच्या वडिलांना धमकावले आणि त्यानंतर दोघांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली.
त्यानंतर सागर याने औरंगाबादच्या बजाज नगरमधून मुलाचे अपहरण केले व त्या मुलाला कारमध्ये घालून नगरच्या दिशेने निघाला. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी तात्काळ आरोपीच्या गावाचा विचार करून नगर व श्रीगोंदा पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची माहिती दिली. मुलाच्या वडिलांकडून माहिती मिळताच जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा सक्रिय झाली.
त्यानंतर श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनीही तात्काळ या प्रकरणाची दखल घेतली. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल रमेश जाधव, अंकुश ढवळे, किरण बोराडे,गोकुळ इंगवले यांचे पथक नगर दौंड रस्त्यावरील पारगाव फाटा येथे पाठवले. तिथे नाकाबंदी करण्यात आली तसेच सायंकाळी सातच्या सुमारास सागर आळेकर याला पकडण्यात आले. त्याची कार जप्त करून अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात आली. मुलाची सुटका केल्यानंतर त्याला आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले