लोकसभेच्या 400 जागांवर भाजपला मात कशी देता येऊ शकते ?, प्रशांत किशोर यांचे ‘ टॉप सिक्रेट ‘ ?

शेअर करा

राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी तब्बल साडेतीन तास चर्चा केली. सुप्रिया सुळे व रोहित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या मीटिंगमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे .भाजपला पर्याय म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्यासह भाजपला शह देण्यासाठीच्या व्यूहरचनेवरही या बैठकीत चर्चा झाली. भाजपला मात कशी देता येईल?, भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र कसे आणता येईल? भाजपविरोधात उभे ठाकण्याचा समान धागा काय असू शकतो, याचं सादरीकरणच प्रशांत किशोर यांनी पवारांना या बैठकीत दिल्याची चर्चा आहे .

भाजपला लोकसभा निवडणुकीत 400 जागांवर मात देता येऊ शकत असल्याचं प्रशांत किशोर यांनी पवार यांना प्रेजेंटेशनच दिल आहे .त्या जागा कोणत्या ? आणि कोणत्या राज्यात किती जागा आहेत, त्या राज्यात कोणते प्रादेशिक पक्ष मोठी भूमिका बजावू शकतात, याची आकडेवारीच प्रशांत किशोर यांनी पवारांना दिली आहे. तसेच एकट्याच्या बळावर काँग्रेस भाजपला हरवू शकत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्षांना एकत्र घेऊन चालल्याशिवाय पर्याय नाही, असंही प्रशांत किशोर यांनी या बैठकीत पवारांना सांगितल्याची माहिती आहे.

प्रशांत किशोर यांनी भाजपविरोधात प्रादेशिक पक्षांना एकत्रित आणण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू केला आहे. प्रशांत किशोर यांनी पवारांनाही प्रादेशिक पक्षांशी संवाद साधून त्यांना आपल्यासोबत एकत्रित आणण्याचा सल्ला दिला आहे. तसेच या वेळी बंगालच्या राजकारणावरही चर्चा झाली. मोदींची लाट असताना आणि भाजप बंगालमध्ये वातावरण निर्मिती करण्यात यशस्वी झालेला असतानाही ममता बॅनर्जी यांनी विजय कसा खेचून आणला, त्यासाठी काय रणनीती वापरली याची माहितीही त्यांनी पवारांना दिली आहे.

शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपूर्वीच पवार-प्रशांत किशोर यांची भेट होणार होती. मात्र काही कारणास्तव ही भेट झाली नाही. भाजपविरोधात राष्ट्रीय स्तरावर मोठी आघाडी निर्माण व्हावी यावर या भेटीत अधिक जोर देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे तसेच काँग्रेसची मते फोडण्यासाठी भाजपने काय काय खेळी केल्या आहेत ? याचीही चर्चा झाली असून समविचारी पक्षांची मते फुटू नयेत म्हणून काय केले जावे याचीही चर्चा झाल्याचे समजते .


शेअर करा