मराठा आरक्षण आंदोलकांसाठी ‘ अत्यंत ‘ महत्वाची बातमी

शेअर करा

मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले अशा व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मराठा आंदोलनात दाखल करण्यात आलेले सरसकट सर्व गुन्हे राज्य सरकारने मागे घेतले आहेत. काही मोर्चांना आणि मराठा आंदोलकांनी पुकारलेल्या बंदला किरकोळ स्वरूपात हिंसक वळणही लागलं होतं. त्यामुळे अनेक आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची सातत्याने मागणी होत होती मात्र अखेर गुन्हे मागे घेतल्यामुळे खासदार संभाजी छत्रपती यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक सातत्याने आंदोलन करत आहेत. या आंदोलकांनी मूक मोर्चांवर भर दिला होता तरीही किरकोळ घटनेत आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते . स्वत: खासदार संभाजी छत्रपती यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली होती. या आधीच्या गृहमंत्र्यांकडेही त्यांनी ही मागणी केली होती. आज अखेर सरकारने त्यांची मागणी मान्य केली आहे. मराठा तरुणांनीही आपली बाजू लावून धरल्याबद्दल संभाजी छत्रपती यांचे आभार मानले आहेत.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी 3 डिसेंबर 2019 मध्ये ट्विट करून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. त्यांनी याबाबत ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याकडे ही मागणी केली होती. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान अनेक आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता आपलं सरकार आलं आहे. त्यामुळे हे गुन्हे मागे घेण्यात यावेत, अशीच सर्वांची अपेक्षा आहे.”

राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील हीच मागणी लावून धरत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लेखी निवेदन दिले होते.“मराठा समाजाने आरक्षणासाठी शांतीपूर्ण आंदोलन केले. त्यावेळी सहभागी युवकांवर तत्कालीन भाजप सरकारनं दाखल केले. आता ते गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. एकही तरुण या गुन्ह्यांमुळे शिक्षण, नोकरीपासून वंचित राहू नये यासाठी योग्य पाऊल उचलावे,” असं आवाहनही मुंडे यांनी केले होते.


शेअर करा