घरातून प्रेमी युगुल पळाले..आधी मुलाची बाईक बेवारस सापडली आणि त्यानंतर ..

शेअर करा

प्रेमाच्या आणाभाका घेतलेल्या प्रेमी युगुलाने चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातल्या केळझर लगतच्या जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. वनपरिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत येत असलेल्या अजयपूर केळझर मार्गावरील पिंपळझोरा मारूती देवस्थानलगत हे मृतहेद आढळून आले. घरातून लग्नास विरोध होत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

जंगलात झाडाला गळफास लावलेले मृतदेह तब्बल 10 दिवसांनंतर उजेडात आले. याच परिसरात जोडप्यापैकी मुलाची बाईक बेवारस सापडली त्यावरून शोध घेतला असता राजू आत्राम आणि सलोनी मडावी (रा. रामणगट्टा, आष्टी जि. गडचिरोली) अशी आहेत मयतांची नावे आहेत. विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोघेही घरातून पळून गेले होते आणि त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

वनपरिक्षेत्र चिचपल्ली अंतर्गत येत असलेल्या अजयपूर केळझर मार्गावरील पिंपळझोरा मारुती देवस्थानलगत कक्ष क्रमांक ४२८ मध्ये वनरक्षक महादेव मोरे सहका-यांसह गस्त करीत असतांना मार्गापासून अर्धा कि.मी. आंत जंगलात पुरूष आणि महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. घटनास्थळी पुरूष आणि महिलेेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत जमीनीवर पडून असल्याचे दिसल्याने पोलिसांनी पंचनामा करून कुजलेले दोन्ही प्रेत उत्तरीय तपासणी करीता उपजिल्हा रूग्णालय मूल येथे रवाना केले.

दहा दिवसांपूर्वी घटनास्थळालगतच्या मार्गावर पोलीसांनी बेवारस अवस्थेत उभी असलेली दुचाकी ताब्यात घेतली होती. बेवारस अवस्थेत सापडलेल्या दुचाकीमधील कागदपत्रावरून पोलीसांच्या तपासात सदर दुचाकी चंद्रपूर येथील मूळ मालकाने विक्री केल्याचे लक्षात आले. तपास सुरू असतांनाच दुचाकी सापडलेल्या जागेपासून अर्धा कि.मी. अंतरावर दोन मृतदेह आढळून आले.

मृतक राजु होमदेव आत्राम रा. रामणगट्टा पो.स्टे.आष्टी असल्याची खात्री पटली. याच गावातील सलोनी रामकृष्ण मडावी (१८) आणि राजू यांचे प्रेमसंबंध होते. परंतू कुटुंबीयांच्या विरोधामूळे राजु आणि सलोनी यांचा विवाह होऊ शकला नाही.आपल्या लग्नास विरोध होत असेल तर जीवन जगण्यात काहीच अर्थ नाही असे ठरवुन दोघांनीही जीवन संपविले.


शेअर करा