…म्हणून सुरेश पिंगळे यांनी पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वतःला पेटवले त्यानंतर ..

शेअर करा

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत अखेर मालवली आहे. सरकार दरबारी किरकोळ कारणासाठी हेलपाटे मारून मारून अखेर त्यांना झुलवत ठेवण्यात आले त्यामुळे त्यांनी बुधवारी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला पेटवून घेतले होते. पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते मात्र अखेर त्यांचा मृत्यू झाला.

सुरेश पिंगळे यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी विलंब होत असल्याने हे टोकाचं पाऊल उचललं होतं. सरकारी बाबूगिरीने हा बळी गेला असून नागरिकांमध्ये सदर प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस व्हेरिफिकेशन सारख्या विषयावर जर नागरिकांना पेटवून घेण्याची वेळ येत असेल तर इतर सरकारी कामाची कल्पनाही करवत नाही. न्याय मिळत नसल्याने यापूर्वी धर्मा पाटील नावाच्या शेतकऱ्याने देखील विष पिऊन आत्महत्या केली होती त्यानंतर हा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे .

सुरेश पिंगळे बुधवारी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आले होते. त्यांना चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र हवं होतं पण त्यांना वेळेवर ते प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांनी संतापात टोकाचं पाऊल उचललं. प्रमाणपत्र मिळत नसल्याने त्यांना नोकरीसाठी देखील अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यांनी स्वत:वर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटत्या अंगाने त्यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली. हा सर्व थरार उपस्थित लोक पाहात होते. त्याचवेळी काहींनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर सुरेश यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दोन दिवसांच्या उपचारानंतरही सुरेश यांची प्राणज्योत मालवली.

इतकी टोकाची भूमिका घेण्याचे कारण काय ?

सुरेश पिंगळे गेल्या दोन अडीच महिने खडगी पोलीस ठाणे तसेच पोलीस आयुक्तालयात हेलफाटे मारत होते मात्र त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं जात नव्हतं. सुरेश पिंगळे हे पाषाण येथील एआरडीई येथे कंत्राटी पद्धतीने ऑफिस बॉयचं काम करायचे त्यामुळे दरवर्षी कॉन्ट्रॅक्ट बदलायचा. जिथे काम करायचे तिथे दरवर्षी पोलीस व्हेरिफिकेशन लागायचं मात्र पोलिसांकडून एकाच नावाचे इतरही व्यक्ती असल्याची कारणे देत त्यांना पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट देण्यास टाळाटाळ करत होते.

सदर घटनेनंतर पिंगळे यांचे कुटुंबिय आक्रमक झाले असून, “मला न्याय हवाय. माझ्या मुलांचं मी काय करु. मला नोकरी नाही. एकतर मला नोकरीला लावावं. मला नोकरी लागली तर मुलांचं पोट भरेल. कारण नोकरीसाठीच त्यांनी आत्मदहन केलं आहे. पोलीस अधिकारी याबाबत लेखी स्वरुपात सांगत असतील आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ”, असं पिंगळे यांच्या पत्नीने सांगितलं आहे .


शेअर करा