नगर शहराच्या ‘ ह्या ‘ मागणीसाठी संग्राम जगताप यांनी घेतली जयंत पाटलांची भेट

शेअर करा

सीना नदीची पूररेषा सिंचन विभागाने नुकतीच निश्चित केली असून यामुळे नगर शहराचा मोठा भाग बाधित होतो आहे त्यामुळे नदीचे फेर सर्वेक्षण करून त्यात बदल करावा, अशी मागणी संग्राम जगताप यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन यासाठी निवेदन दिले आहे.

संग्राम जगताप यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातून वाहणाऱ्या सीना नदीची लांबी 14 किलोमीटर इतकी आहे. नदीला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. नदीच्या पुरामुळे जीवितहानी झाल्याचे एकही उदाहरण नाही, कारण शहराभोवतीचा भाग दुष्काळी आहे. नदीवर पिंपळगाव माळवी येथे धरणाही बांधण्यात आलेले आहे त्यामुळे पुराचा शहराला धोका नाही. सिंचन विभागाने निश्चित केलेल्या पूररेषेत शहरातील देखील मोठा परिसर येतो त्यामुळे हा भाग बाधित होणार असल्याने इमारतीच्या बांधकामांना परवानगी मिळणार नाही.

नगर शहरावर एक प्रकारे हा अन्याय असून त्याचा शहराच्या विकासावर परिणाम होणार आहे. शहरात संरक्षित ऐतिहासिक वास्तू आहेत या वस्तूंपासून तीनशे मीटर अंतरावर बांधकाम करण्यास देखील निर्बंध आहेत. अनेक नागरिक व शेतकरी यामुळे अडचणीत येणार असून सीना नदीचे फेरसर्वेक्षण करून बदल करावेत, अशी संग्राम जगताप यांनी जयंत पाटील यांच्याकडे मागणी केलेली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार यावेळी उपस्थित होते.


शेअर करा