
नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला जितेंद्र उर्फ पप्पू बाबूलाल शिंदे याने आज पहाटे येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केलेली असून याप्रकरणी मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली असून त्यांनी , ‘ शेवटी ताईला देवानेच न्याय दिला. आरोपींनी इतका भयावह अपराध केलेला होता की त्यांना फाशीची शिक्षा मिळावी म्हणून सर्व जातीधर्मातील नागरिकांनी मागणी केलेली होती मात्र शेवटी सरकारने न्याय दिला नाही तर देवानेच न्याय दिला. आरोपींना आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला आणि त्यानंतर देवाने न्याय दिला , ‘ असे म्हटलेले आहे
येरवडा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार , आरोपी जितेंद्र शिंदे हा मानसिक रुग्ण होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर उपचार देखील सुरू करण्यात आलेले होते. लोखंडी पट्टीवर टॉवेलच्या साह्याने त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे गस्तीवरील असलेल्या पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर कारागृह अधीक्षक यांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आणि त्याचे शव खाली उतरवून पंचनामा करण्यात आला. ससून रुग्णालय त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून देण्यात आलेला आहे.
13 जुलै 2016 रोजी संध्याकाळच्या वेळी पीडित मुलगी तिच्या आजोबांच्या घरी मसाला आणण्यासाठी गेली होती त्यावेळी घरी परत येत असताना आरोपी जितेंद्र शिंदे याने तिला अडवले आणि त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. मुलगी घरी परतली नाही म्हणून आईच्या सांगण्यावरून चुलत भाऊ शोध घेत असताना त्याला बांधावरील लिंबाच्या झाडाखाली आरोपी जितेंद्र शिंदे उभा असल्याचे दिसले. मुलीच्या भावाला पाहिल्यानंतर आरोपी जितेंद्र शिंदे हा तेथून पळून गेलेला होता. इतर तीन जणांनी देखील त्याला पळून जाताना पाहिलेले होते. 29 नोव्हेंबर रोजी न्यायालयाने प्रकरणातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलेली होती. संतोष गोरख भवाळ व नितीन गोपीनाथ भैलुमे अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत.