महाराष्ट्रात एक अत्यंत खळबळजनक घटना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एकूरका इथे उघडकीला आली असून विहिरीत पडून बाप लेकाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. रोहन नटराज धस ( वय तेरा वर्षे ) आणि नटराज रामहरी धस ( वय ३३ ) अशी मयत बापलेक यांची नावे आहेत.
उपलब्ध माहितीनुसार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीत शिकत असलेला रोहन धस हा शाळा सुटल्यानंतर त्याचे वडील नटराज धस यांच्या सोबत शेतात गेला होता त्यावेळी शेतातील राजाभाऊ धस यांच्या विहिरीत पाणी पिण्यासाठी उतरला मात्र पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्यासाठी म्हणून त्याच्या वडिलांनी विहिरीत उडी घेतली मात्र रोहन याने वडिलांच्या गळ्यात मिठी मारली आणि दोघेही पाण्यात बुडून मृत्युमुखी पडले . विहिरीजवळ कोणीच नसल्याने घटना घडल्याचे कोणालाच लक्षात आले नाही.
रात्र होऊनही दोघे घरी न परतल्याने परिसरातील रहिवाशांनी त्यांचा शोध सुरू केला त्यावेळी विहिरीच्या बाजूला चप्पल आणि विहिरीत चॉकलेटचे कागद आणि चिप्सचा पुडा आढळून आला त्यावरून दोघेही विहिरीत पडलेले असल्याचा अंदाज आला आणि गावकऱ्यांनी गळ टाकून शोध घेतला तसेच पाण्यात कॅमेरा टाकून देखील शोध घेण्यात आला त्यावेळी त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच नातलगांनी जागीच टाहो फोडला.