राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. ऑक्सिजन आणि रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्या मतदारसंघात परस्पर रेमडेसीवीर इंजेक्शनचा वाटप करणारे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना न्यायालयाने चांगलेच सुनावले असून ‘गैरमार्गाने केलेल्या कामाचा हेतू कधीच शुद्ध राहत नाही’ अशा शब्दांत कानपिचक्या दिल्या आहेत.
सुजय विखे पाटील यांनी अहमनगर जिल्ह्यात रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे दिल्लीतून रेमडेसीवीर इंजेक्शन आणून वाटप केले होते. राज्यात तुटवडा असताना सुजय विखे यांनी गुपचूप केलेल्या प्रकारामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर खंडपीठाच्या न्यायाधीशांनी सुनावणी केली.
तुम्ही जर एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काम करत असताना बेकायदेशीर मार्गाचा वापर केला तर तो कधी शुद्ध नसतो, अशा शब्दांत न्यायमूर्ती घुगे यांनी सूजय विखेंना सुनावले आहे.
सूजय विखे यांनी कोणतेही गुन्हेगारीचे काम केले नाही. रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला होता. लोकांची मदत करण्यासाठी त्यांनी विमानाने जाऊन रेमडेसीवीर इंजेक्शनचा साठा आणला होता आणि तो लोकांमध्ये वाटला होता, हा गुन्हा ठरू शकत नाही, असा युक्तीवाद सूजय विखेंच्या वकिलांनी केला असल्याची माहिती आहे.
सूजय विखे यांनी रेमडेसीवीर इंजेक्शन विमानातून घेऊन आल्यानंतर व्हिडीओ चित्रित केला. हा ड्रामा करण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. आपण मतदारसंघातील खासदार असून दिल्लीत आपले वजन वापरून कशा प्रकारे इंजेक्शन्स आणली, हे सांगण्याचा दिखाऊपणा होता, तो टाळता आला असता, असे खडेबोलही न्यायमूर्तींनी सुनावले आहे.